शिवरायांच्या पुतळ्याबाबत मोठा हलगर्जीपणा; दुर्घटनेनंतर समोर आली धक्कादायक माहिती

नौदल दिनानिमित्त समुद्रकिनाऱ्यावरील राजकोट परिसरात आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा सोमवारी दुपारी मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे कोसळला आणि अवघा महाराष्ट्र हळहळला.व्यवस्थेविरुद्ध संताप व्यक्त करीत शिवप्रेमींनी घटनास्थळी धाव घेतली.

घटनास्थळी पोलिस बंदोबस्तही वाढविण्यात आला असून, कोणालाही जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.नौदल दिनानिमित्त दि. ४ डिसेंबर २०२३ रोजी नौदल विभागाने राजकोट परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारला होता. हा पुतळा शिवप्रेमींसाठी आकर्षण ठरला होता.

गेले दोन, तीन दिवस किनारपट्टीवर वादळी वारे आणि मुसळधार पाऊस सुरू आहे. यातच दुपारी वादळीवाऱ्यामुळे पुतळा कोसळला. हा प्रकार स्थानिकांच्या लक्षात येताच त्यांनी याची माहिती प्रशासनास दिली. त्यानंतर स्थानिक महसूल तसचे पोलिस अधिकारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले.

२८ फूट उंच पुतळा होता छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पूर्णाकृती पुतळा सुमारे ४३ फूट उंच होता. जमिनीपासून चबुतरा बांधकाम १५ फूट तर त्यावर २८ फूट उंच पुतळा उभारण्यात आला होता. सुशोभीकरण आणि इतर व्यवस्थेसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली कार्यालयाने सुमारे पाच कोटी रुपये खर्च केले होते.पुतळ्याच्या चौथऱ्यासाठी १५ फूट खोलीचे लोखंडी अँगल टाकून पक्के बांधकाम करण्यात आले होते.

त्यावर पुतळ्याचे पार्ट (अवयव) जोडण्यात आले. जमिनीतून उभारण्यात आलेले अँगल पुतळ्याच्या छातीपर्यंत उभारले असते तर पर पुतळा कोसळून पडला नसता, असे मत स्थानिक बांधकाम व्यावसायिकांमधून व्यक्त होत आहे.