कोल्हापूर जिल्ह्यातील १०२५ ग्रामपंचायतींचा ऑनलाइन कारभार ठप्प…..

आपले सरकार केंद्र सुरू ठेवण्यासंबंधी शासनाचे स्पष्ट आदेश नसल्याने जिल्ह्यातील सर्व १०२५ ग्रामपंचायतींचा ऑनलाइन कारभार कोलमडला आहे. आपले सरकार केंद्रातील ऑपरेटरनी काम बंद केले आहे.परिणामी ग्रामस्थांना मिळणाऱ्या ऑनलाइन सेवा खंडित झाल्या आहेत. परिणामी सर्व ग्रामपंचायती ऑफलाइन झाल्या आहेत.

जिल्ह्यातील १०२५ ग्रामपंचातयींचा ऑनलाइन कारभार ७३५ आपले सरकार केंद्रातून चालत होता. ग्रामपंचायतीमधील या केंद्रातील खासगी ऑपरेटरना सन २०१६ पासून सीएससी-एसपीव्ही कंपनीतर्फे मानधन दिले जात होते. मात्र, या कंपनीचा करार ३० जून २०२४ रोजी संपला. त्यानंतर केंद्र चालवण्याची जबाबदारी शासनाने महाआयटी कंपनीकडे सोपविली. मात्र, महाआयटीने ग्रामपंचायतीमधील आपले सरकार केंद्र चालविण्यास नकार दिला.

त्यानंतर सरकारने केंद्रासंबंधीचे स्पष्ट असे आदेश दिले नाहीत. केंद्रातील ऑपरेटरचा, बारा तालुक्यांतील व्यवस्थापक आणि एक जिल्हा व्यवस्थापकाच्या पगारासंबंधी प्रश्न निर्माण झाला आहे, म्हणून या सर्वांनी काम बंद केले आहे.जन्म, मृत्यू दाखला, विवाह नोंदणी, नमुना १ ते ३३ प्रमाणपत्रे, पीएम विश्ववकर्म, लाडकी बहीण नोंदणी, गती शक्ती, कर्मचारी मानधन, केंद्र चालक मानधन, ई-ग्रामस्वराज्य अशा ऑनलाइन सेवा बंद झाल्या आहेत. ग्रामपंचायतींच्या गतिमान कारभाराला ब्रेक लागला आहे. ऑफलाइनमुळे कारभारात शिथिलता आली आहे.