शेतकऱ्यांना केंद्र सरकार दरमहा 3000 रुपये पेन्शन देणार,पीएम किसान मानधन योजना नेमकी काय? पात्रता अन् अटी

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेद्वारे केंद्र सरकार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये पाठवतं. आतापर्यंत 17 हप्त्यांची रक्कम म्हणजेच 34 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवण्यात आले आहेत.

पीएम किसान सन्मान योजनेप्रमाणं प्रधानमंत्री किसान मानधन योजना देखील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे. पीएम किसान मानधन योजनेद्वारे शेतकऱ्यांना वयाच्या 60 वर्षांनंतर दरमहा 3 हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. ही योजना नेमकी काय? या योजनेच्या अटी कोणत्या, योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावं लागते हे जाणून घेणार आहोत.

पीएम किसान मानधन योजना नेमकी काय?

पीएम किसान मानधन योजनेद्वारे शेतकऱ्यांना वयाच्या 60 वर्षांनंतर दरमहा तीन हजार रुपये पेन्शनच्या स्वरुपात दिले जातात. ही योजना ऐच्छिक असून यामध्ये शेतकऱ्यांना 55 ते 200 रुपये जमा करावे लागतात.

वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना दरमहा 3 हजार रुपये मिळतात. नागरी सुविधा केंद्रातून किंवा राज्य नोडल ऑफिसर यांच्याकडून या योजनेसाठी मोफत नोंदणी करता येते.

18 ते 40 वर्षांच्या दरम्यान वय असणाऱ्या शेतकऱ्यांना 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत 55 ते 200 रुपयांचा प्रिमियम भरावा लागेल. केंद्र सरकार देखील या योजनेत शेतकऱ्यांच्या सोबत पैसे जमा करेल.या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांकडे 2 हेक्टर पेक्षा कमी शेती असणं आवश्यक आहे. शासकीय आकडेवारीनुसार या योजनेसाठी 20 लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी नोंदनी केली आहे.

पीएम किसानचा 18 वा हप्ता कधी मिळणार?

पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये मिळतात. पीएम किसान सन्मान योजनेद्वारे आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर 17 हप्त्यांची रक्कम जमा करण्यात आलेली आहे.

पीएम किसान सन्मान योजनेचा 18 हप्ता ऑक्टोबर महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाण्याची शक्यता आहे. पीएम किसान योजनेचे सहा हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जातात.