निक्कीला लगावली आर्याने कानाखाली…

‘बिग बॉस मराठी’ 5 वा सीझन सध्या बराच गाजतोय, घरात सतत वाद होताना दिसतात, त्यामुळे शो चर्चेत असतो. नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात झालेल्या एका घटनेमुळे तर मोठा वादंग निर्माण झाला आहे. एका टास्कदरम्यान निक्की तांबोळी आणि आर्यामध्ये वाद झाला. त्याचदरम्यान जोरदार राडा झाला आणि तेवढ्यात आर्याने निक्कीला जोरदार कानाखाली लगावली. या घटनेनंतर बिग बॉस आता आर्याला शिक्षा सुनावणार आहेत. मात्र यामुळे काही नेटकरी भडकले आहेत. तर निक्कीला अद्दल घडायला हवी होती असे म्हणत काही नेटकऱ्यांनी आर्याचं चक्क कौतुक केलंय.आर्याला जर शिक्षा दिली, घराबाहेर काढलं तर बिग बॉस पाहणंच बंद करू असा इशाराही काही प्रेक्षकांनी दिला आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या घरात कॅप्टन्सीचा टास्क सुरू होता. याच कॅप्टन्सी टास्कदरम्यान निक्की -आर्यामध्ये भांडण जोरदार झालं. त्यांची वादावादी होण्याआधी निक्कीने अंकिता आणि पंढरीनाथ कांबळी यांनाही सुनावलं होतं. तर निक्कीसोबत भांडण झाल्यानंतर चिडलेल्या आर्याने निक्कीच्या कानशिलात लगावली. याचे जोरदार पडसाद उमटले. बिग बॉसने आर्याला तिच्या कृत्याबद्दल कठोर शिक्षा सुनावली. पण ही शिक्षा काय आहे हे प्रोमोमध्ये दिसलं नाहीये.

कॅप्टन्सी पदाच्या टास्कदरम्यान जादुई हिरा मिळवण्यासाठी अंकिता, वर्षा ताई, जान्हवी, निक्की आणि आर्या यांच्यात चढाओढ झाली. यात जादुई हिरा मिळवण्यासाठी झटापट सुरू होती. त्यांच्या या भांडणाने टोक गाठलं आणि एका क्षणी आर्याने निक्कीला कानाखालीच लागवली.यानंतर निक्कीने ‘बिग बॉस’ला सांगितलं की आर्याने मला मारलंय, मी ते सहन करू शकत नाही. तिने आर्याला एव्हिक्ट करण्याचीही मागणी केली. बिग बॉसनेही आर्याच्या कृतीचा निषेध करत तिला शिक्षा सुनावण्याचा निर्णय घेतलाय. तिला काय शिक्षा होते, ते आजच्या भागात स्पष्ट होईल.

मात्र नेटकऱ्यांनी आर्याला पाठिंबा दर्शवला आहे. निक्कीला अद्दल घडायला हवी होती, आर्याने योग्य केलं असे अनेकांनी म्हटलंय. आर्याने निक्कीला मारल्याने मन सुखावलं असल्याचे एका युजरने नमूद केलं. आर्याने अगदी चांगले केलेले आहे. आर्या यांना bigg Boss ने काही शिक्षा केल्यास आम्ही बिग बॉस बघणे बंद करू , असं एका युजरने सुनावलं. ‘जर आर्या चुकीची ठरवली असेल तर ” अरबाज चा पण ताबा सुटला होता ” त्यानी ही अभिजित ला चुकीच्या पद्धतीने धक्का दिला आहे ” त्याला शिक्षा करा ” आम्ही काय डोळे झाकून bb बघत नाही ” नाहीतर ॲक्शन रिप्ले मध्ये आर्याची चापट दाखवा ‘असंही एका युजरने म्हटलं. पण काही लोकांनी आर्याच्या कृत्याचा निषेधही केलंय. “कारण कितीही योग्य असलं तरीही हिंसा करणं चुकीचं आहे” असं त्यांचं म्हणणं आहे.