विधानसभेत काँग्रेसच काय कुणालाही पाठिंबा नाही, वंचित नेते प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले..

आगामी विधानसभा निवडणुकांचे आता साऱ्यांना वेध लागले असून त्या अनुषंगाने राजकीय पक्षाकडून रणशिंग फुंकले जात आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्येही जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आल्या असून लवकरच जागावाटप घोषित होऊ शकते. तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून 7 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज मुंबई येथील पत्रकार परिषदेत वंचितच्या विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यावेळी मात्र विधानसभेत काँग्रेसच काय कुणालाही पाठिंबा देणार नसल्याची मोठी घोषणा वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांनी बोलताना स्पष्ट केली आहे.

मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी काँग्रेसमधील काही उमेदवारांनी आम्हाला पाठिंबा मागितला होता. त्यानुसार आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा दिला. मात्र आता विधानसभा निवडणुकीत आम्हाला कोणीही पाठिंबा मागितला तर आम्ही तो कुणालाही देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत वंचितने वेगळी रणनीती आखली असल्याची शक्यता आहे.त्या पाठोपाठ आता वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनीही विधानसभा निवडणुकांसाठी वंचितच्या 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे वंचितकडून विधानसभा निवडणुकांसाठी प्रथमच तृतीयपंथी उमेदवाराला देखील तिकीट देण्यात आलंय.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, वेगवेगळ्या ओबीसी संघटना आणि त्याचबरोबर आदिवासी समुहातील राजकीय पक्ष आहेत त्यांना सोबत घेऊन निवडणुकीत उतरवण्याचे ठरवले आहे. या आघाडीला अजून आम्ही नाव दिलेलं नाही, पुढे नाव देणार आहोत. काही जणांशी आम्ही बोलतोय, सोबतच काही संघटनांशी बोलतोय . लोकसभा निवडणुकीत आम्ही पाहिलं आहे, पैशाचा महापूर होता. आता महापुराचा महापूर येईल विधानसभेत असं आम्हाला वाटतं. त्यामुळे उमेदवारांना वेळ मिळावा म्हणून यादी जाहीर करतोय . रावेर, सिंदखेड राजा, वाशिम, धामणगाव रेल्वे, साकोली, लोहा, औरंगाबाद, शेवगाव, अनापूर ही पहिली यादी जाहीर करतो, असे देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले.