‘विकासासाठी आम्ही सत्तेत, पण शरद पवारांना’ विधानसभेच्या तोंडावर दिलीप वळसे पाटलांचे मोठे विधान

राज्यात विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम रंगणार आहे. त्यामुळे सर्वच मतदारसंघात नवनवीन राजकीय घडामोडी समोर घडत आहेत. त्यातच तालुक्याचे आमदार आणि सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मोठे वक्तव्य केले आहे. काही लोक विचारतात की तुम्ही पवार साहेबांना का सोडलं? पण शरद पवारांना सोडायचा प्रश्नच येत नाही. कारण बऱ्याच लोकांना आतल्या गोष्टी माहीत नसतात, असे दिलीप वळसे पाटील म्हणाले आहेत. त्यामुळे आपण शरद पवार यांना सोडत नसल्याचे सायलेंट संकेत पाटील यांनी दिले आहेत.

तालुक्यातील एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी भाषणात हे विधान केले आहे.दिलीप वळसे पाटील हे राज्यातील ज्येष्ठ नेतृत्व असून ते शरद पवारांचे विश्वासू मानले जातात. पण शरद पवारांशी फारकत घेऊन महायुतीत सामील झाल्याने ते टीकेचे धनी ठरले होते. यातच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय नेतेही संभ्रमात टाकणारी विधानं करताना पाहायला मिळत आहेत. दिलीप वळसे पाटील यांनीही आपली भूमिका मांडली आहे.

तसेच महायुतीत सामील होतानाच्या घडामोडींवर प्रकाश टाकला आहे.दिलीप वळसे पाटील म्हणाले की, ज्यावेळी ५४ आमदारांची बैठक झाली, त्यावेळी सरकारमध्ये होण्याची चर्चा झाली. पण आपण कोणत्या पक्षात गेलो नाही, आपला पक्ष राष्ट्रवादी व चिन्ह घड्याळच आहे. रखडलेली विकासकामे पूर्ण करण्यासाठी सत्तेत जाणे गरजेचे होते. गेल्या दोन वर्षांत अजितदादा अर्थमंत्री असल्याने त्यांनी भरभरून पैसा दिला व त्याचा मतदारसंघाला फायदा झालेला दिसतोय. राजकारणात झालेला बदल हा त्या परिस्थिती प्रमाणे हाताळायचा असतो.

याचा अर्थ लगेच आपण साहेबांचे दुश्मन झालो, साहेब आपले दुश्मन झाले असे नाही. त्यांच्याबाबत प्रेम व आदर आजही आपल्यात कायम आहे. पण विरोधकांकडे मुद्दे नाहीत, काही भांडवल नाही, बोलायला मुद्दे नाहीत म्हणून ते बोलत असतात.आज मी मंत्रिमंडळात नसतो तर एवढा निधी आपल्या तालुक्यासाठी आणू शकलो नसतो. माझ्या मतदारसंघातील कोणत्याही गावात जा दोन ते चार कोटी निधी आलाच आहे. कधी मंचरला निधी मिळत नव्हता. आता मंचरला ८५ कोटींचा निधी दिला. मतदान होईल तेव्हा होईल, पण आपलं मंचर सुधारलं पाहिजे असे वळसे पाटील म्हणाले आहेत.