महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागायच्या आधीच महाविकास आघाडीने संभाव्य राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन सत्तास्थापनेच्या दृष्टीने चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. जवळपास बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांनी महाविकास आघाडीला १३० हून अधिक जागा मिळतील, असे अंदाज वर्तवले असल्याने निवडून येऊ शकतील, अशा आघाडीतील बंडखोरांना संपर्क साधण्यास सुरुवात करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठीचे मतदान संपन्न झाले आहे. जवळपास तीस वर्षांनी राज्यात मतदानाचा टक्का वाढल्याने वाढलेला मतटक्का कुणाच्या बाजूने जाणार अशी उत्कंठा राजकीय वर्तुळाला लागून राहिली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीला सत्तास्थापन करण्याची संधी असेल एवढ्या संघर्षपूर्ण लढती होतील, असे निष्कर्ष बहुतांशी मतदानोत्तर चाचण्यांमधून समोर आले आहेत.
त्यामुळे निकालाआधीच आमदारांची जुळवाजुळव करण्याच्या हालचाली आघाडीच्या सुरू झाल्या आहेत.शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी निवडून येऊ शकतील अशा बंडखोरांना संपर्क साधल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षातील नेते परंतु काही कारणांनी पक्षाला उमेदवारी न देता आल्याने संबंधित लोक अपक्ष म्हणून निवडणुकीच्या आखाड्यात उतरले होते.
यापैकी जे निवडून येऊ शकतात, त्यांना जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात यांनी संपर्क साधल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.दोन पक्षात पडलेली फूट तसेच सहा पक्ष निवडणुकीच्या रिंगणात असल्याने महाराष्ट्रात अभूतपूर्व निवडणूक निकाल लागतील, असे विविध मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीलाही बहुमत मिळविताना नाकीनऊ येऊ शकते, असे अंदाजही वर्तविण्यात आल्याने अपक्ष आमदारांना भाव वधारला आहे.
जर कुणालाच बहुमत मिळाले नाही तर अपक्षांच्या जोरावर .युती-आघाडी सत्ता स्थापनेचा दावा करू शकते. अशा परिस्थितीत अपक्ष आमदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न निकालाआधीच सुरू झालेले पाहायला मिळत आहेत.