सोलापूर जिल्ह्यातील एका आमदाराला मिळणार कॅबिनेट मंत्रिपदाची संधी? ‘ही’ नावे चर्चेत

राज्यात महायुतीचेच सरकार सत्तेवर बसणार हे निश्चित झाले आहे. सोलापूर जिल्ह्यात भाजपला पाच जागा मिळाल्या असून त्यातील एका आमदाराला पहिल्या टप्प्यात मंत्रिपद निश्चित मानले जात आहे.सोलापूर शहर उत्तरमधून विजयकुमार देशमुख यांनी पाचव्यांदा तर दक्षिण सोलापुरातून सुभाष देशमुखांनी विजयाची हॅट्रिक केली आहे. तर सलग दुसऱ्यांदा समाधान आवताडे यांनी विजय मिळवला आहे. सध्यातरी या तिघांपैकी एकाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडेल, असे सूत्रांकडून सांगितले जात आहे.

जिल्ह्यात २०१४ च्या निवडणुकीत जिल्ह्यात शहर उत्तरमध्ये विजयकुमार देशमुख व दक्षिण सोलापुरातून सुभाष देशमुख हे दोघेच भाजपचे आमदार होते. तरीदेखील, देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात त्या दोघांनाही मंत्रिपदाची लॉटरी लागली होती.

२०१९ मधील अडीच वर्षांत जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार असतानाही एकालाही मंत्रिपद मिळाले नाही. आता पुन्हा भाजपच मोठा भाऊ ठरला असून त्यांच्या मंत्रिमंडळात सोलापूरला प्रतिनिधित्व मिळेल हे नक्की. सध्या सोलापूर जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार असून त्यात विजयकुमार देशमुख यांनी पाचव्यांदा अर्ध्या लाखांहून अधिक मताधिक्य घेऊन विजय मिळवला आहे.

तर दक्षिण सोलापुरातून सुभाष देशमुख यांनी जिल्ह्यात सर्वाधिक ७७ हजारांहून अधिक मताधिक्य घेऊन विजयाची हॅट्रिक साधली आहे. 2021 पोटनिवडणुकी नंतर आवताडे विजयी झाल्यानंतर महायुती सत्ता आली होती.

उर्वरित आमदारांपैकी एकजण नवखा असून एका आमदारांची दुसरी टर्म आहे. तरुण चेहऱ्याला संधी देण्याची भूमिका पक्षाने घेतली तर सचिन कल्याणशेट्टी यांनाही संधी मिळू शकते. पण, सध्यातरी दोन्ही देशमुखांपैकी एकाला मंत्रिपद फिक्स आहे. २६ नोव्हेंबरपूर्वी नवे सरकार सत्तेवर येणार असून आज सोमवारी संभाव्य मंत्र्यांची यादी फायनल होणार असून उद्या मंगळवारी त्यांचा शपथविधी होईल.

मंत्रिमंडळातील मुख्यमंत्र्यासहित एकूण मंत्र्यांची संख्या विधानसभेतील एकूण सदस्यांच्या १५ टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही, अशी तरतूद आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत २८८ आमदार आहेत, म्हणजेच २८८ च्या १५ टक्के म्हणजे एकूण मंत्र्यांची संख्या ४३ होते. सरकारच्या मंत्रिमंडळात जास्तीत जास्त ४३ मंत्री होऊ शकतात. त्यातले किती कॅबिनेट मंत्री व किती राज्यमंत्री करायचे, हे मुख्यमंत्र्यांच्या हाती असते. महायुतीत सध्या भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस असे तीन पक्ष व काही मित्र पक्षदेखील आहेत. जातीय समिकरणाची सांगड घालत मंत्रिमंडळ विस्तार होईल हे निश्चित.