सांगोला तालुक्याच्या राजकारणाला मिळणार वेगळी दिशा… 

स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या काळापासून सांगोला हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. या बालेकिल्ल्यावर विधानसभा निवडणुकीमध्ये शेकापचेच आजपर्यंत जादा काळ वर्चस्व राहिले आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघात यावेळी झालेल्या तिरंगी लढतीत शेतकरी कामगार पक्षाने बाजी मारली आहे. पाच हजार कोटींची विकासकामे असो अथवा तालुक्यातील लाडक्या बहिणींचीही म्हणावी एवढी साथ विद्यमान आमदारांना मिळाली नाही.दोन्ही आजी-माजी आमदारांच्या मतविभाजनाचा फायदाही शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारास झाल्याचे चित्र दिसून आले.

या वेळच्या निवडणुकीमध्ये आमदार शहाजीबापू पाटील व दीपकआबा साळुंखे- पाटील दोघेही निवडणुकीच्या रिंगणामध्ये दोन्ही शिवसेनेकडून उभे राहिले होते. गतवेळी निवडणूक लढवलेले डॉ. अनिकेत देशमुख यांनी यावेळी डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्याशी असलेले मतभेद दूर करून दोन्ही चुलत बंधू या निवडणुकीमध्ये विजय मिळवण्याच्या दिशेनेच कामाला लागल्याचे दिसून आले.गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर तालुक्यात शेकापमध्ये निर्माण झालेली पोकळी डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी भरून काढली होती.

या निवडणुकीमध्ये त्यांना शेकापकडून तिकीट मिळाल्याने सत्तेपासून दुरावलेल्या शेकापच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या ईर्षेने या निवडणुकीत पक्षाचा प्रचार करून विजयश्री खेचून आणल्याचे दिसून आले. यावेळी तालुक्यातील प्रमुख तिन्ही नेत्यांना मिळालेली मते, त्यांच्या मागे असणारा कार्यकर्त्यांचा संच यावरूनच या पुढील काळात तालुक्याच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळणार, हे मात्र निश्चित झाले आहे.