अक्षय शिंदेची हत्या केली, आता कुठे होते सिंघम? संजय राऊतांचा शिंदे, फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल

राज्याला लाभलेले तीन-तीन सिंघम दिवसाढवळ्या हत्या, बलात्काराच्या घटना घडताना कुठे असतात, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सिद्दिकी यांचे पुत्र, आमदार झिशान सिद्दिकी यांच्या वांद्रे इथल्या निर्मलनगर परिसरातील कार्यालयाबाहेरच घडलेल्या या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना राऊतांनी सरकारवर निशाणा साधला. अभिनेता सलमान खानशी असलेली मैत्री बाबा सिद्दिकी यांना भोवली असावी, अशी चर्चा आहे. त्यात सलमानला सतत जीवे मारण्याच्या धमक्या देणाऱ्या लॉरेन्स बिष्णोई गँगशीही कनेक्शन असल्याचं म्हटलं जातंय.

याविषयी संजय राऊत म्हणाले, “प्रश्न एसआरचा असेल किंवा फिल्मी कलाकारांशी मैत्रीचा असेल किंवा अन्य काही असेल. पण मुंबईत हत्या झाली आहे ना. म्हणजे तुम्ही कायदा-सुव्यवस्था राखण्यात पूर्णपणे अपयशी ठरला आहात. या राज्यामध्ये गुंडांचीही अशाप्रकारे हत्या होता कामा नये. तुम्ही अक्षय शिंदेची हत्या केली ना, पोलिसांनी. सिंघम ना. मग सिंघम अशावेळी कुठे असतात. हे जे तीन-तीन सिंघम महाराष्ट्राला लाभले आहेत. एक मुख्य सिंघम, दोन डेप्युटी सिंघम. मग ते तीन-तीन सिंघम दिवसाढवळ्या हत्या, बलात्काराच्या घटना घडताना कुठे असतात? एका अक्षय शिंदेला तुम्ही मारलंत आणि स्वत:ला सिंघम म्हणून घोषित केलंत. आता तुम्हाला काय राष्ट्रपतींनी परमवीर चक्र द्यायचा का? राज्यपालांनी शिफारस करावी की या तीन सिंघमना परमवीर चक्र द्या म्हणून.”

“एकनाथ शिंदे यांचा पोलीस खात्यातील हस्तक्षेप आहे. गुंड टोळी चालवावी असं पोलीस दल हाताळत आहेत. फडणवीस हतबल आहेत. त्यांनी मंत्रिमंडळात राहू नये. गुंड टोळ्या जशा चालवल्या जातात, तसं शिंदे पोलिसांचा वापर करत आहे. दोन महिन्यात या खाकी टोळ्यांचा बंदोबस्त केला जाईल. मोदी आणि शाह तुम्हाला हंटर घेऊन पळवत आहे. तुम्ही पळत आहात. चोर पोलीस खेळ सुरू आहे. जनता त्यांना फटकावणार आहे. आमच्यासाठी कालची घटना दुर्देवी आहे. कधीकाळी बाबा सिद्दिकी आमचे सहकारी होते. मुंबईत पूर्वी गँगवार होता. तो खत्म झाला. आजचा गँगवॉर सरकारमध्ये आहे. ज्या पद्धतीने गृहमंत्रालय चाललंय हे निष्क्रीय आणि बदनाम गृहमंत्रालय आहे,” अशा शब्दांत त्यांनी टीका केली.