जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही; नूतन आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख

डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता. निवडणुकीनंतर जेवढे मताधिक्य तेवढे वृक्षारोपण लावण्याचा त्यांनी संकल्प केला असून शनिवारी दुपारी मुंबईहून त्यांचे सांगोला येथे आगमन झाले. यावेळी सर्वसामान्य नागरिकांनी त्यांना भेटण्यासाठी मोठी गर्दी केली होती. सर्वसामान्य नागरिक, महिला, तरुण व कार्यकर्ते हार, तुरे, गुच्छ, बुके याऐवजी विविध प्रकारच्या झाडांची रोपे देऊन डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे अभिनंदन करून शुभेच्छा देत होते. यावेळी ते येणाऱ्या नागरिकांशी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते.

आगामी काळात सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध असेन असे सांगून आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख म्हणाले, की सांगोल्याच्या  सर्वसामान्य जनतेसमोर मी नतमस्तक आहे. हा विजय आपली जबाबदारी वाढवणारा आहे. दिवंगत भाई गणपतराव देशमुख यांच्याप्रमाणे माझ्यावर मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेने मोठा विश्वास दाखवलेला आहे. त्यामुळे आपल्याला काम करावे लागेल, याची जाणीव आहे. जनतेने दाखवलेल्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही. तालुक्याचा प्रथम नागरिक म्हणून आता जबाबदारी वाढली आहे.

विधानसभा निवडणुकीतील यशाने आम्ही हुरळून जाणार नाही. सर्वच गावांमध्ये शेतकरी कामगार पक्षाला चांगले यश मिळाले आहे.  माझ्यासह सर्व कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची जबाबदारी वाढली असून आम्हाला इथून पुढे अधिक बारकाईने काम करावे लागेल, आम्ही जनतेच्या ऋणात राहू इच्छितो. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

 सांगोला मतदारसंघातील सर्व जनतेचा पाठिंबा आणि विश्वास हीच आपली ताकद आहे. सर्वसामान्य जनतेच्या भल्यासाठी काम करणे हेच माझे ध्येय असून, भविष्यातही मी तुमच्या सेवेसाठी तत्पर राहीन. आपले प्रेम आणि आशीर्वाद कायम राहू द्या, असे आवाहन करत विधानसभा निवडणुकीतील यशाने आम्ही हुरळून जाणार नाही, असे मत नूतन आम. डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केले.