महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेना 81 पैकी तब्बल 57 जागा जिंकत महायुतीतला नंबरचा दोनचा पक्ष ठरला होता. भाजपनंतर राज्यात सर्वाधिक जागा या शिंदेंच्या शिवसेनेने जिंकल्या आहेत.मात्र,शिवसेनेतील बंडापासून शिंदेंना भक्कम साथ देणारे सांगोल्याचे ‘काय झाडी,काय डोंगार,काय हाटेल’फेम शहाजीबापू पाटील यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला. हा पराभव शहाजीबापू पाटील यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.
त्यानंतर आता शहाजीबापूंनी खळबळजनक विधान केलं आहे. सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रिपदासह एकनाथ शिंदेंच्या उपमुख्यमंत्रीपदाबाबत केलेलं विधान राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. ते म्हणाले, भाजप आमदारांच्या रेट्यामुळेच फडणवीस मुख्यमंत्री झाले. पण एकनाथ शिंदे हे आता कोणत्या खुर्चीवर आहेत, याला इतिहासात काही महत्त्व राहिलेलं नाही. जनतेच्या मनावर राज्य करणारे ते लोकनेते असल्याचं कौतुकोद्गार शहाजीबापू यांनी काढले आहेत.
तसेच शिवसेना पक्षवाढीसाठी एकनाथ शिंदेंकडू मला जी मोठी जबाबदारी देण्यात येईल,ती अतिशय चांगल्याप्रकारे निभावेल.आपल्या कामाच्या माध्यमातून शिंदेंनी दिलेल्या संधीचं नक्कीच सोनं करेल, असंही माजी आमदार शहाजीबापू यांनी यावेळी सांगितलं.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत 132 जागा निवडून आणत महायुतीत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला. पण तरीही शिंदे हे मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही होते.पण देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर भाजप पक्षश्रेष्ठींकडून मुख्यमंत्रीपदासाठी शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे शिंदे यांना अजित पवारांसोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यावी लागली. यावरच बापूंनी केलेलं विधान महायुतीतील मोठा भाऊ असलेल्या भाजपच्या जिव्हारी लागण्याची शक्यता आहे.