नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत इचलकरंजी मतदारसंघातून जिल्ह्यातील उच्चांकी मताधिक्य घेऊन भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार डॉ. राहुल आवाडे विजयी झाले. आमदार होताच त्यांनी कामाचा सपाटा सुरु केला असून प्रलंबित कामांचा पाठपुरावा करत ती मार्गी लावली जात आहे. महापूरामुळे नुकसान झालेल्या हातकणंगले तालुक्यातील ९५१६ पूरग्रस्त शेतकर्यांचे अनुदान सोमवारपासून त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. या कामी आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून निवडणूक काळात दिलेल्या वचनांनी पूर्तता केली जात आहे. पावसाळ्यात पंचगंगा नदीला आलेल्या महापूरामुळे हातकणंगले तालुक्यातील अनेक शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले होते.
या पूरग्रस्त शेतकर्यांच्या नुकसानीचे पंचनामे करुन त्यांच्या अनुदानाची रक्कमही निश्चित झाली होती. परंतु मध्यंतरीच्या काळात हे अनुदानाचे काम प्रलंबित राहिले होते. आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी याकडे लक्ष वेधत शासन दरबारी पाठपुरावा केला. तसेच प्रांताधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करुन नुकसानीचे अनुदान तातडीन शेतकर्यांच्या खात्यावर जमा करण्याबाबत सूचना केल्या होत्या. आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे येत्या सोमवारपासून तालुक्यातील ९५१६ पूरग्रस्त शेतकर्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा केली जाणार आहे.
त्यामुळे पूरबाधित शेतकर्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. त्याचबरोबर आणखीन कोणाचे नुकसानीचे पंचनामे अथवा अनुदान मिळणे बाकी असल्यास त्याचीही माहिती घेतली जाणार आहे.