लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघात शिवसेनेकडून विद्यमान खासदारांना संधी देण्यात आली होती. मात्र कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून संजय मंडलिक यांना पराभव स्वीकारावा लागला. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील माने विजयी झाले. या विजया मागे जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे आणि राजश्री शाहू आघाडीचे नेते आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भूमिका महत्त्वाची होती. खासदार माने यांच्या विजयासाठी कोरे आणि यड्रावकर यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आली होती. त्यांच्यावर दिलेली जबाबदारी या दोघांनीही यशस्वीपणे पार पाडली.
राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात कोल्हापुरातील दोन नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले. कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला घवघवीत यश मिळाले असताना, मात्र लोकसभा निवडणुकीत हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे विजयाचे शिलेदार असणाऱ्यांनाच महायुतीने दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील जिल्ह्यातील चारही मतदारसंघात तीन घटक पक्षाचे उमेदवार निवडून आलेत तर एका जागेवर भाजप विजयी झाले आहे. मात्र खासदार धैर्यशील माने यांच्या विजयाचे शिलेदार असणारेच मंत्रिपदापासून वंचित राहिले आहेत.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. पन्हाळा शाहूवाडीतून विनय कोरे, हातकणंगलेतून अशोकराव माने हे जनसुराज्य पक्षातून विजयी झाले आहेत. शिरोळमधून राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी त्यांच्याच राजर्षी शाहू आघाडीतून बाजी मारली. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात भाजपकडून राहुल आवाडे विजयी झाले. या मतदारसंघातून तीन पक्षाचे आमदार हे महायुतीच्या घटक पक्षाकडून आहेत.
आमदार विनय कोरे आणि राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आघाडी आणि महाविकास आघाडीच्या काळात मंत्रिपदावर मोहर उमटवली होती. त्यामुळे महायुती सरकारच्या काळात मंत्रीपदावर यड्रावकर आणि कोरे यांनी देखील दावा केला होता. मात्र काल झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात याच घटक पक्षांना महायुतीकडून दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे या समर्थकांमध्ये देखील मोठी नाराजी आहे.