महाराष्ट्रात डेंग्यूचा कहर! प्रतिबंधासाठी मार्गदर्शक सूचना जारी

राज्यात डेंग्यू रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोना महामारीनंतर आता डेंग्यूने राज्यात थैमान घातल्याचं पाहायला मिळतंय. राज्यात दर दोन तासाला डेंग्यूने पॉझिटीव्ह असलेल्या रुग्णांची नोंद होत आहे. नुकत्याच हाती आलेल्या वैद्यकीय रिपोर्टमध्ये ही माहिती समोर आलीये. यामुळे नागरिकांच्या मनात चिंता आणि भीती निर्माण झालीये.  देशभरातील डेंगू च्या रुग्णसंख्येत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच पहिल्या क्रमांकावर उत्तर प्रदेश आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, साल २०२३ मध्ये १ जानेवारी ते ३० नोव्हेंबरपर्यंत देशात २ लाख ३४ हजार ४२७ डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. यापैकी महाराष्ट्रात १७ हजार ५३१ इतकी डेंग्यूच्या रुग्णांची संख्या आहे. डेंग्यू रुग्णसंख्येत बिहार दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथे एकूण १९ हजार ६७२ रुग्ण आढळले आहेत. तर उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक ३३ हजार ७३ डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत.

राज्यात एकट्या मुंबईमध्ये ४ हजार ३०० रुग्ण आढळून आलेत. बीएमसी आरोग्य विभगातील सूत्रांकडून याबाबत माहिती मिळालीये. डेंग्यू रुग्णांमध्ये झपाट्याने होणारी वाढ पाहता आरोग्य विभागाने काही सूचना जाहिर केल्यात. डासांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी नागरिकांनी स्वत:ची योग्य ती काळजी घ्वावी.

डेंग्यू आजाराची लक्षणे

  • सतत पोटदुखीचा त्रास.
  • त्वचा कोरडी, थंड किंवा तेलकट होणे.
  • त्वचेवर बारिक पुरळ येणे आणि नाक, तोंड आणि हिरड्यातून रक्त येणे.
  • वारंवार उलट्या होणे.
  • अस्वस्थता, सतत झोप येणे.
  • घसा कोरडे पडणे, सतत तहान लागणे.
  • श्वास घेताना त्रास होणे.

डेंग्यूची लागण होऊनये यासाठी ही काळजी घ्या

  • डेंग्यूपासून स्वत:चा बचाव व्हावा यासाठी घरामध्ये कुठेही पाणी साठणार नाही याची काळजी घ्या.
  • साठलेल्या पाण्यात डेंग्यूचे मच्छर तयार होतात.
  • तुमच्या परिसरात जास्त मच्छर असतील तर घरी कडुलींबाचा पाला दरवाजाजवळ लावून ठेवा.
  • झोपताना मच्छरदानीचा उपयोग करा.