जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी उद्धव ठाकरे मोर्चात सहभागी

जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात सरकारी कर्मचारी नागपुरात आंदोलन करत आहेत.  1982 मध्ये शासनाने सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू केली होतीय मात्र महाराष्ट्र शासनाने ही पेन्शन योजना बंद करून शासकीय कर्मचाऱ्यांवर अन्याय केल्याचा आरोप केला जात आहे. ही पेन्शन योजना सर्वात शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांना पूर्ववत सुरू करण्यासाठी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महामोर्चा नागपूर (Napur) येथे सुरु असून तो हिवाळी अधिवेशनावर धडकणार आहे. त्याआधी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आंदोलनकर्त्यांना भेट दिली. महाराष्ट्रात कोणताच वर्ग सरकारवर खुश नाही, असे उद्धव ठाकरे (Uddhav Thackery) यांनी यावेळी म्हटलं आहे.

“दीड महिन्यापूर्वी मला आपले नेते भेटले आहेत. अडीच वर्षे आपलं सरकार होतं तेव्हा पाच दिवसांचा आठवड्याचा निर्णय घेतला. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा जुनी पेंशन योजना लागू करता येते की नाही याच्या चर्चेला सुरुवात झाली होती. गद्दारांनी गद्दारी करुन आपलं सरकार पाडलं. जर मी मुख्यमंत्री असतो तर तुम्हाला मोर्चा काढावा लागला नसता. सरकार म्हणून आमचे चेहरे असतात. कागदावरच्या घोषणा जमिनीवर आणण्याचे काम तुम्ही करत असता. अशा महत्त्वाच्या घटकाला स्वतःच्या मागणीसाठी आक्रोश करावा लागत असेल आणि सरकार त्यावर काणाडोळा करत असेल. तर त्यांना टेंशन देण्याची गरज आहे. महाराष्ट्रात कोणताच वर्ग सरकारवर खुश नाही. हे अवैधपद्धतीने आणलेलं सरकार आहे,” असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.

“सगळे जण हेच सांगत होते की गद्दारांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. खोकेबाज सरकार तुम्हाला न्याय देईल असं वाटतं का? मी मुख्यमंत्री नाही, माझा पक्ष चिन्ह चोरलं आहे. मी मुख्यमंत्री असतो तर निर्णय घेऊ शकलो असतो. पण आज काही नसताना ताकद आणि विश्वास द्यायला आलो आहे. मी शब्द देतो शिवसेना तुमच्यासोबत प्रत्येक पावलावर सोबत राहील. सरकारचे मित्र हजारो कोटी रुपयांचा चुना लावून पळून गेले. तेव्हा पैशाचा चुराडा नाही झाला का? तुम्ही सुरु केलेला लढा आता न्याय मिळवल्याशिवाय थांबवायचा नाही. ही ताकद सत्ताधाऱ्यांचे डोळे फाडणारी आहे. निवडणूक येतेय म्हणून सरकार तुम्हाला फसवू शकेल. जसे 2014 साली सांगितले होते की अच्छे दिन आयेंगे. फसव्या योजनांचे मायाजाल सर्वसामान्यांपेक्षा तुम्हाला अधिक माहिती आहे. पाच राज्यांध्ये झालेले कर्मचाऱ्यांचे मतदान सत्ताधाऱ्यांच्या विरोधात होतं,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.