गेल्या काही दिवसांपासून राज्यातील जिल्ह्यांमध्ये वेगवेगळे तपमान पाहायला मिळत आहे. काही जिल्ह्यांमध्ये थंडी, काही जिल्ह्यांमध्ये दमट हवामान तर काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असून यामुळे अवकाळी पावसाला पोषक स्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या चार ते पाच दिवसांमध्ये राज्यात पुन्हा किमान तापमानात घटणार आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात 2-4 अंश सेल्सियसने तापमान घसरणार आहे. येत्या 24 तासांमध्ये विदर्भातील पारा 4 ते 5 अंशाने हळूहळू घसरणार आहे. येत्या पाच दिवसात विदर्भात कमाल तापमानात फारसा परिणाम जाणवणार नाही. येत्या चार दिवसात राज्यात पुन्हा थंडी जाणवायला लागणार असल्याचे प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवले आहे. तर, मध्य महाराष्ट्रात कमाल तापमानात येत्या चार ते पाच दिवसात 1-2 अंशांनी वाढ होणार असून किमान तापमान 2-4 अंश सेल्सियसने कमी होणार आहे.
तपमानात बदल होत असल्याने याचा नागरिकांचा आरोग्यावरही परिणाम पाहायला मिळू शकतो, ज्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.तसेच, नवीन वर्षाची सुरुवात ही गुलाबी थंडीने होणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील काही ठिकाणी हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हिमाचल प्रदेश, राजस्थान, पंजाब हरियाणा भागात थंडीची लाट राहणार असून राज्यात कोरडे हवामान राहणार आहे, अशी माहिती सुद्धा हवामान विभागकडून देण्यात आली आहे.