अनेक गावात अंधश्रद्धा, भानामतीसारख्या घटना घडत असतानाचे चित्र आपणाला पाहावयास मिळत असतेच. स्मशानभूमीत देखील हे प्रकार भरपूर प्रमाणात घडत असतात. स्मशानभूमी गावाच्या बाहेर असल्याने अशा घटना समजण्यास विलंब होतो. भानामतीचा असाच एक प्रकार नुकताच हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथे उघडकीस आलेला आहे.
पट्टणकोडोली स्मशानभूमीत जादूटोणासारखा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.दोन पुरुष, दोन स्त्रिया, त्यांच्या फोटोला टाचण्या तसेच काळ्या बाहुल्या, लिंबू, काळे कापड, असे अर्धवट जळालेल्या अवस्थेत साहित्य आढळले आहे. या अघोरी घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. गावच्या वेशीवर असलेल्या स्मशानभूमीत हळद-कुंकू लावून लिंबू टाकणे, परडी सोडणे अशा वारंवार घटना घडत असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.पट्टणकोडोली गावाबाहेर असणाऱ्या स्मशानभूमीत मध्यरात्री भोंदूबाबा, मांत्रिक येऊन असे प्रकार करतात. गावापासून लांब असलेल्या स्मशानभूमीत असे प्रकार होत असल्याने गावकर्यांच्या भावनेशी खेळ सुरू आहे.
या घटनेमुळे अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि जादूटोणाविरोधी कायद्यालासमोरच आव्हान उभे राहिले आहे. स्मशानभूमी, गावाच्या वेस, नदीकडे जाणारे रस्ते या ठिकाणी बुधवारी, शनिवारी, अमावास्या आणि पौर्णिमेच्या मध्यरात्री बाहेरगावच्या काही लोकांसह गावातील विकृत लोकांकडून असे अघोरी प्रकार केले जातात अशी चर्चा आहे. बुधवारी ८ तारखेला गावातील एका महिलेच्या अंत्यविधीवेळी मध्यरात्री स्मशानभूमीत ग्रामस्थ गेले असता ही घटना समोर आली.
गावात अशा घटना होत असतील तर हे चुकीचे आहे. पुढे असा प्रकार घडू नये यासाठी पट्टणकोडोली ग्रामपंचायत प्रशासनकडून योग्य खबरदारी घेतली जाईल. असे आश्वासन पट्टणकोडोलीचे उपसरपंच अमोल बाणदार यांनी दिले.