यात्रा कालवधीमध्ये जीबीएस आजाराच्या अनुषंगाने अन्नसुरक्षाची काळजी घेण्याचे डॉ. अनिकेत देशमुख यांचे आवाहन

सध्या सांगोला येथे श्री अंबिकादेवीची यात्रा सुरु आहे. त्यामुळे अलोट गर्दी पहायला मिळत आहे. अलीकडेच मात्र जीबीएस हा रोग देखील फैलावत आहे. त्यामुळे नागरिकांनी आपापली काळजी घेणे खूपच महत्वाचे आहे. सांगोलाचे ग्रामदैवत श्री. अंबिकादेवी यात्रेस मोठ्या उत्साही वातावरणात प्रारंभ झाला आहे. यात्रा कालवधीमध्ये व गर्दीच्या ठिकाणी जीबीएस आजाराच्या अनुषंगाने अन्नसुरक्षाची काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ. अनिकेत देशमुख यांनी केले आहे. 

यात्रा कालावधी मध्ये व गर्दीच्या ठिकाणी अन्नपदार्थ बनवताना स्वच्छ वातावरणात व स्वच्छ जागेमध्ये तयार करावेत स्वच्छ व निर्जंतुक पिण्यायोग्य पाण्याचा पिण्यासाठी तसेच अन्न पदार्थ बनविण्यासाठी वापर करावा. ग्राहकांना केवळ ताजे अन्न पदार्थाचीच विक्री करावी. कोणत्याही परिस्थीतीत शिळे, बुरशी आलेले, मुदतबाह्य, विटलेले अन्न पदार्थाची विक्री करू नये व सेवन करू नये. अशा प्रकारच्या अन्न पदार्थची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावावी.

तयार अन्नपदार्थ हे नेहमी झाकून ठेवलेले असावेत जेणेकरून त्यावर धुळ, कीटक, माशा बसणार नाहीत व अन्न पदार्थ दुषित होणार नाही याची काळजी घ्यावी. उघड्यावरील व माशा, कीटक, धुळ बसलेले अन्न पदार्थाचे सेवन करण्यात येऊ नये. दुध व दुग्धजन्य अन्नपदार्थ हे ताजे व योग्य तापमानात साठवणूक केलेले योग्य कालावधी मध्येच सेवन करावे अन्नातून विषबाधा होणार नाही याची खबरदारी घ्यावी. यात्रा कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडणार नाही, तसेच जीबीएस आजाराच्या अनुषंगाने अन्न सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन डॉ. अनिकेत देशमुख यांनी केले आहे.