स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना सांगोला या योजनेच्या कामाचे भूमिपूजन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजेनेचे काम सुरु होणार असल्याने १२ गावातील सुमारे १५ हजार ४०० हेक्टर जमीनींना बंदिस्त नलिकेव्दारे शेतीला लवकरच कायमस्वरुपी पाणी मिळणार आहे. यामुळे सांगोला तालुक्यातील दुष्काळ कायमस्वरुपी संपून तालुका शंभर टक्के दुष्काळमुक्त होणार आहे असे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. यावेळी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार बाबासाहेब देशमुख, माजी खासदार रणज- तिसिंह नाईक- निंबाळकर, माजी आमदार शहाजीबापू पाटील, दीपक साळुंखे पाटील, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता डॉ. ह. तु. धुमाळ, भीमा कालवा अधिक्षक अभियंता धीरज साळी यांच्या मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य दुष्काळ मुक्त करण्याचा संकल्प केला आहे. राज्यातील शेतकरी दुष्काळातून आता मुक्त झाला पाहिजे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेच्या कामास शासनाने सुधारीत प्रशासकीय मंजुरी दिली या योजनेकरिता उजनी धरणामधून दोन टीएमसी पाण्याची तरतूद असून या पाण्याद्वारे सांगोला तालुक्यातील १२ गावातील सुमारे १३ हजार ५५ हेक्टर क्षेत्रास व सांगोला शाखा कालवा क्र. ५ अंतर्गत २ हजार ३४५ हे. असे एकूण १५ हजार ४०० हे. क्षेत्राचा सिंचनाचा लाभ मिळणार आहे. ब-याच वर्षापासून शेतकऱ्यांची मागणी यानिमित्ताने पूर्ण होत असून कायमस्वरूपी दुष्काळ असलेला हा भाग सिंचनाने सुजलाम-सुफलाम होणार आहे. पुढील तीन वर्षात ही योजना पुर्ण करण्यात येणार आहे. या योजनेसाठी लागणारा निधी कमी पडू दिला जाणार नाही राज्यामध्ये सांगोला तालुका हा पूर्णतः दुष्काळमुक्त होण्याचा काम होत आहे, असे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.