इचलकरंजी व कोल्हापूर महापालिका क्षेत्रासाठी तीन आसनी ऑटो रिक्षांसाठी एक मार्चपासून भाडेदरात वाढ

प्रत्येक भागात काही ना काही मागण्या या असतातच . त्या पूर्ण करण्यासाठी अनेक वेळा आंदोलने देखील केली जातात. इंधन दर वाढल्याने विविध रिक्षा संघटनांनी भाडे वाढीची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन प्राधिकरण कोल्हापूर व इचलकरंजी यांची संयुक्त बैठक झाली. यात जिल्ह्यातील तीन आसनी ऑटो रिक्षांसाठी भाडे वाढीबाबतचा निर्णय झाला.

कोल्हापूर व इचलकरंजी महापालिका क्षेत्रासाठी तीन आसनी ऑटो रिक्षांसाठी एक मार्चपासून भाडेदरात वाढ करण्यात आली आहे. सध्याचा किमान भाडे दर बावीस रुपये असून, सुधारित दर पंचवीस रुपये होईल. मध्यरात्री बारा ते पहाटे पाच कालावधीसाठी किमान भाडेदराच्या पंचवीस टक्के, तर ग्रामीण भागासाठी याच वेळेतील भाडे वाढ चाळीस टक्के असणार आहे. प्रवाशांसमवेत असणाऱ्या सामानासाठी ६० बाय ४० सेंटीमीटरच्या आकाराच्या किंवा त्यापेक्षा मोठ्या नगासाठी तीन रुपये शुल्क असणार आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली व पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत हे निर्णय झाले.

दरम्यान, ऑटो रिक्षांचे मीटर पुन:प्रमाणिकरण (मीटर कॅलिब्रेशन) करण्यासाठी एक मार्च ते ३१ मेपर्यंत मुदत आहे. मीटर पुन:प्रमाणीकरण करून घेतील, त्यांच्यासाठी एक मार्चपासून भाडे सुधारणा लागू राहील, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिली. जे ऑटो रिक्षाचालक दिलेल्या मुदतीत मीटर पुनःप्रमाणीकरण करून घेणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. मीटर पुन:प्रमाणिकरण न केल्यास मुदत समाप्तीनंतरच्या प्रत्येक दिवसासाठी पन्नास रुपये, तर किमान पाचशे रुपये तथापि, कमाल तडजोड शुल्क दोन हजार रुपयांपेक्षा अधिक असणार नाही, असे श्री. भोर यांनी स्पष्ट केले.