सद्या अनेक फसवणुकीच्या घटना घडत आहेत. याला सर्वसामान्य जनता बळी देखील पडत आहे. असाच एक प्रकार विट्यात उघडकीस आलेला आहे. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसवणूक टळली आहे. हुपरी येथील एकाने 60 टंचाची कच्ची चांदी देत त्याबदल्यात विट्यातील सराफाकडे दागिने मागितले. मात्र दागिने घेण्यापूर्वीच संबंधितांनी व्यवहारासाठी आणलेली चांदी 20 टंचाची असल्याचे निष्पन्न झाले. प्रकरण पोलिसांपर्यंत गेले, पण प्रत्यक्षात व्यवहार पूर्ण झाला नसल्याने गुन्हा घडला नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे. सराफ व्यावसायिकाच्या सतर्कतेमुळे फसवणूक टळली.
बुधवार, 26 फेब्रुवारी रोजी दुपारी एक व्यक्ती विटा येथील सराफ व्यावसायिकाकडे आली. त्याने चांदीच्या पट्ट्या देत सराफास ‘घरी कार्यक्रम आहे, त्यामुळे मला घाई आहे. ही 60 टंचाची कच्ची चांदी आहे, याबदल्यात दागिने पाहिजेत, असे सांगितले. त्यावर सराफाने वजन करून चांदी ताब्यात घेतली. नेहमीप्रमाणे टंच काढण्यासाठी पाठवली. तोपर्यंत संबंधित व्यक्तीने चांदीचे दागिनेही निवडले. दरम्यानच्या काळात टंच काढण्यासाठी गेलेल्या माणसाने सराफास फोन करून, ही चांदी 60 नव्हे, तर 20 टंचाची असल्याचे सांगितले.
सराफाने ही माहिती संबंधित व्यक्तीला दिली. त्यावर त्याने ‘हे शक्यच नाही’ असे म्हणत सराफास समोरच्या माणसाला फोन करायला लावला. टंच काढण्यासाठी गेलेल्या माणसाने पुन्हा त्याला कच्ची चांदी, साठ नव्हे, तर वीस टंचाचीच असल्याचे सांगितले. यावर त्याने आपण हुपरी गावातून चांदी घेऊन थेट इकडेच आलो आहे. दिलेली चांदी ही 60 टंचाचीच आहे असे ठासून सांगितले. त्यावर संबंधित सराफ आणि ती व्यक्ती असे दोघेही टंच काढणार्या व्यावसायिकाकडे गेले. तेथे प्रत्यक्षात कच्ची चांदी वीस टंचाची निघाली.
आता मात्र संबंधित सराफ आणि ती व्यक्ती दोघेही एकमेकांकडे संशयाने पाहायला लागले. त्यावर टंच काढणार्यांनी, तुम्ही ताबडतोब विटा पोलिस ठाणे गाठा, असा सल्ला दिला. त्यावरून हे प्रकरण विटा पोलिसांपर्यंत गेले. तिथे गेल्यावर पोलिसांनी दोन्ही बाजू ऐकून घेऊन यामध्ये व्यवहारच पूर्ण झालेला नाही, त्यामुळे गुन्हा घडलाच नाही, असे सांगत संबंधित सराफाला तुमची काही तक्रार आहे का? असे विचारले. त्यावर त्याने आपली काहीही तक्रार नाही असे पोलिसांना लेखी लिहून दिले. विटा सराफ असोसिएशनने या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. काल, गुरुवारी विटा पोलिस ठाण्यात येऊन पुन्हा असे प्रकार घडू नयेत, यासाठी पोलिसांनी सहकार्य करावे अशी मागणी केली आहे.