हातकणंगले तालुक्यातील आळते, लक्ष्मीवाडी, बिरदेववाडी येथील शेतकऱ्यांना गुड न्यूज

आळते येथील सोलर प्रोजेक्ट सुरू झाल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची नाईट शिफ्ट बंद झाली आहे. शेतकऱ्यांना दररोज दिवसा वीज मिळू लागल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. आळते, लक्ष्मीवाडी, बिरदेववाडी येथील १४१८ कृषी पंपांना वीज पुरवठा उपलब्ध झाला आहे. दरम्यान, यापूर्वी कुंभोज फिडरवरील शेतकऱ्यांनाही सोलर वीज उपलब्ध करून दिली असून चोकाक फिडरवरील काम ही गतीने सुरू असून येत्या पाच ते सहा महिन्यात हातकणंगले उपविभागातील सर्व कृषी पंपांना दिवसा वीज देण्याचा संकल्प उपकार्यकारी अभियंता रविंद्र पाटील यांनी बोलून दाखविला.

शेतीपंपाला १२ तास ते ही दिवसा वीज मिळावी अशी शेतकऱ्यांची सातत्याने मागणी होती. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने मुख्यमंत्री कृषी सौरपंप योजना तयार केली. याची तातडीने अंमलबजावणीही सुरू केली. सध्या कोल्हापूर जिल्ह्यात सहा फिडरवर सौरप्रकल्पातून वीज दिली जात आहे. आळते येथे धुळोबाच्या पायथ्याशी २५ एकर गायरानवर हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.

या प्रकल्पात दररोज ४ मेगा व्हॅट वीज तयार करून हातकणंगले येथील सबस्टेशनला जोडणी दिली असून तेथून सकाळी ९.३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत शेतीपंपाना वितरीत केली जाते. या प्रकल्पाच्या शेतकऱ्यांसाठी प्रती युनिट ६ रूपये शासनावर भार पडत होता. आता या खर्चात किमान ५० टक्के बचत होणार आहे. रात्र पाळी वीजेमुळे शेतकऱ्यांना जागरण करावे लागत होते. याचा परिणाम दुसऱ्या दिवसाच्या शेती कामांवर होत होता. आता दिवसा वीज मिळू लागल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. याबद्दल महावितरणचे अभिनंदन करतो.