राज्यात वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह पाऊस, हवामान विभागाकडून या जिल्ह्यांना येलो अलर्ट

गेल्या दोन दिवसांपासून किनारपट्टी भागात ढगाळ हवामान आहे. मासेमारी ठप्प झाल्याने बाजारपेठेवरती परिणाम झाला आहे. मच्छी वरती अवलंबून असणारे छोटे मोठे व्यवसाय ठप्प झाले आहे. सुरमई मासे 900 रुपये किलो झाले आहे.

राज्यात ऊन तापत असताना बेमोसमी पावसाचे संकट आहे. राज्यात वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह पाऊस होणार असल्यामुळे शेतकऱ्यांसमोर संकट निर्माण झाले आहे. हवामान विभागाने चार जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये सोसायट्याचा वारासह मुसळधार पाऊस पडणार आहे. या भागांत 40 किमी ताशी वेगाने वादळी वारे वाहणार आहे. त्यामुळे कोकणात मासेमारी करणाऱ्यांच्या अडीच हजार बोटी किनाऱ्यावर आल्या आहेत.

उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे देशातील हवामानात सतत बदल होत आहेत. महाराष्ट्रात दिवसा ऊन तापत आहे तर संध्याकाळी थंड वारे वाहात आहेत. दक्षिणेकडून येणाऱ्या वाऱ्याचा वेग वाढला आहे. दक्षिण भारतातील तमिळनाडू, कर्नाटकमध्ये वादळी वाऱ्यासह अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या बदलाचा परिणाम महाराष्ट्रातही होणार आहे.

हवामान विभागाने वादळी वाऱ्यासह पावसाच्या इशारा दिल्यामुळे रत्नागिरीत शेकडो मच्छीमारी बोटी किनाऱ्याला आल्या आहेत. दोन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या वाऱ्याचा खोल समुद्रातील मासेमारीवर परिणाम होणार आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश मच्छीमारी बोटी बंदरात उभ्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात अडीच हजार मच्छीमारी बोटी आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून किनारपट्टी भागात ढगाळ हवामान आहे. मासेमारी ठप्प झाल्याने बाजारपेठेवरती परिणाम झाला आहे. मच्छी वरती अवलंबून असणारे छोटे मोठे व्यवसाय ठप्प झाले आहे. सुरमई मासे 900 रुपये किलो झाले आहे. मिरकरवाडा, जयगड, साखरी नाटे, हर्णे, पूर्णगड, गुहागर, देवगड, मालवण बंदरात मच्छीमारी बोटी किनाऱ्यालाच आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागात दीड तास शुक्रवारी रात्री अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे तोडणी करून ठेवलेली मिरचीचे पिकाला फटका बसला आहे. रात्री २:३० वाजेपासून पहाटे चार वाजेपर्यंत दीड तास रिमझिम पाऊस पडला. अनेक भागात मिरचीची तोडणी झाली असून मिरची उन्हाळ्यात खुल्या मैदानामध्ये शेतकरी ठेवतात. परंतु त्या मिरचीला अवकाळी पावसाचा फटका बसला. या पावसामुळे मिरचीचे नुकसान झाल्याचे चित्र गडचिरोली जिल्ह्यात दिसत आहेत.