मुंबई-गोवा प्रवास अवघ्या 6 तासांत पूर्ण होणार, तीन जिल्ह्यातून जाणारा कोकण एक्स्प्रेस वे

मुंबई गोवा महामार्ग गेल्या कित्येक वर्षांपासून रखडला आहे. मुंबईहून गोवा गाठण्यासाठी साधारण 12-13 तासांचा प्रवास करावा लागतो. मात्र नागरिकांचा हा त्रास वाचवण्यासाठी प्रशासनाकडून नवीन मुंबई-गोवा महामार्ग सेवेत आणण्याची तयारी सुरू आहे. नवीन मुंबई-गोवा महामार्ग मार्च 2026 पर्यंत सेवेत येण्याची शक्यता आहे. 466 किमीचा या महामार्गामुळं पनवेल-सिंधुदुर्गमध्ये थेट कनेक्टिव्हिटी निर्माण होणार आहे. तसंच, प्रवाशांचा वेळदेखील वाचणार आहे.

एकदा का हा महामार्ग पूर्ण झाल्यास मुंबई-गोवा प्रवासाचे अंतर सहा तासांवर येणार आहे. प्रवाशांनाही वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागणार नाही. सध्या मुंबई-गोवा प्रवासासाठी 12-14 तास लागतात. मात्र नवीन महामार्गामुळं हे अंतर 6 तासांत पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर हा नवीन महामार्ग 4 लेनचा असणार आहे.

नवीन महामार्ग रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातून जाणार असून या जिल्ह्यातील अनेक छोटी गावं, शहरांना थेट कनेक्टिव्हीटी मिळणार आहे. त्यामुळं या गावांचा देखील विकास होणार आहे. या गावांत हॉस्टिपल, बिझनेस आणि वाहतुकीचे स्त्रोत निर्माण होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. उद्योगासाठी नव्या संधी विकासित होणार आहेत.

कोकण एक्स्प्रेस प्रकल्पाची मुळ मुदत डिसेंबर 2023 देण्यात आली होती. मात्र अनेक समस्यांमुळं या कामाला विलंब झाला. जमीन अधिग्रहण आणि पर्यावरणाची मंजुरी यामुळं या महामार्गाला अधिक वेळ लागला,असं अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

महत्त्वकांक्षी कोकण एक्स्प्रेस प्रकल्प 10 टप्प्यात विभागला गेला आहे. त्यातील सिंधुदुर्ग येथील दोन टप्पे 99 टक्के पूर्ण झाले आहेत. तर, रत्नागिरी येथील 5 टप्पलांचे काम 92 आणि 98 टक्के पूर्ण झाले आहेत. रायगड जिल्ह्यातील काही काम 92 व 82 टक्के पूर्ण झाले आहे. येत्या काळात हे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल, असं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

या महामार्गाची एक खास बाब म्हणजे टोल वसुली पद्धत स्वयंचलित नंबर प्लेट ओळख तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. या प्रणालीमुळं वाहनांना थाबंवण्याची गरज पडणार नाही. टोल आपोआप कपात होणार आहे. त्यामुळं वाहतुक कोंडी होत नाही आणि वेळ आणि इंधनाचीदेखील बचत होते. या महामार्गामुळं महाराष्ट्राच्या आर्थिक, सामाजिक आणि पर्यटनाला चालना मिळणार आहे.