वाटंबरे गाव हॉटेल व्यवसायासाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होते. राष्ट्रीय महामार्ग होण्याच्या आधी वाटंबरे येथे बाहेरून येणाऱ्या सर्व गाड्या चहापाणी, नाश्ता, जेवण, कुंदा-पेढा तसेच विश्रांतीसाठी आवर्जून थांबत होत्या. परंतु गावामध्ये उड्डाणपुलाचे काम झाल्यापासून सर्व वाहने उड्डाणपुलावरून जातात. त्यामुळे आम्हाला मोठ्या प्रमाणावर आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. तसेच या गावातील सर्व व्यवसाय पूर्णपणे मोडकळीस आलेले आहेत. काही व्यावसायिक बाहेरगावी निघून गेले आहेत, अशी खंत हॉटेल व्यावसायिकांनी व्यक्त केली. पण, राष्ट्रीय महामार्गाचे काम झाल्यापासून रस्त्याचा विकास झाला, पण रस्त्यावर येणारी गावे मात्र भकास झाली असल्याचे चित्र दिसून येत आहे.
केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली देशामध्ये सर्वत्र रस्त्यांची मोठ्या प्रमाणात विकासकामे चालू आहेत. रस्त्यांची विकासकामे चालू असताना या रस्त्यावर येणारी गावे मात्र भकास होत आहेत. त्या गावातील व्यावसायिक मात्र देशोधडीला लागत आहेत. यामध्ये रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाटंबरे, पाचेगाव, जुनोनी, नागज, कुची, शिरढोण या गावातील व्यावसायिक या रस्त्यामुळे उद्ध्वस्त झाले आहेत. गाव तिथे उड्डाणपुलाची निर्मिती असल्याने हा रस्ता बनवताना ज्याठिकाणी गाव आहे, त्याठिकाणी उड्डाणपुलाची निर्मिती केली गेलेली आहे. या उड्डाणपुलामुळे रत्नागिरी-नागपूर रोडवरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांची तसेच एसटी बसेस, मालवाहतूक गाडी, प्रवासी गाड्या या सर्व उड्डानपुलावरून जात आहेत. यामुळे या गावातील हॉटेल व्यवसाय व इतर व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालेले आहे.