आयपीएल (IPL) २०२५ मधील 50 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्समध्ये पार पडला. या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २१७ धावांचा डोंगर उभारला होता. त्यानंतर फलंदाजासाठी आलेल्या राजस्थान संघाचा डाव अवघ्या ११७ धावांवर गुंडाळला गेला. मुंबईने १०० धावांनी विक्रमी विजयाची नोंद केली. मुंबईने या विजयासह पॉइंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकाचे स्थान गाठले, त्यासोबतच आयपीएल २०२५ मधील सर्वात मोठ्या विजय आपल्या नावावर केला आहे. आयपीएलच्या इतिहासामधील सर्वात मोठे पाच विजयांमध्ये मुंबईचाच नंबर आहे. इतर चार विजय कोणत्या संघांनी मिळवले आहेत जाणून घ्या.
आयपीएलच्या (IPL) इतिहासामधील पाचव्या क्रमाकांचा विजय आरसीबीने मिळवला आहे. आरसीबीने २०१३ साली पुणे वॉरियर्सला 130 धावांनी हरवले होते, धावांच्या फरकाने इतिहासामधील पाचवा मोठा विजय होता. या सामन्यात आरसीबीच्या ख्रिल गेल याने १७५ धावा केल्या होत्या. आजपर्यंत त्याचा हा विक्रम कोणीही मोडू शकलेलं नाही. चौथ्या क्रमांकावर आरसीबीच असून २०१५ मध्ये पंजाब किंग्सला १३८ धावांनी पराभूत केले होते. त्यानंतर तिसऱ्या स्थानावर कोलकाता असून १८ एप्रिल २००८ साली आरसीबीला १४० धावांनी पराभूत केले होते. कोलकाताच्या कर्णधारपदाची जबाबदारी सौरव गांगुलीकडे होती.
दुसऱ्या क्रमांकावर आरसीबीच असून त्यांनी २०१६ ला गुजरात लायन्सचा १४४ धावांनी पराभूत केले होते. त्यावेळी विराट कोहलीकडेच कर्णधारपदाची जबाबदारी होती. तर या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर पाचवेळा विजेतेपदावर नाव कोरणाऱ्या मुंबई इंडियन्स असून २०१७ ला दिल्ली डेअरडेविल्सला 146 रन्सने हरवले होते. मुंबईच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीचा संघ अवघ्या 66 धावांवर ऑल आऊट झाला होता.
दरम्यान, मुंबई इंडियन्सने राजस्थानचा १०० धावांच्या फरकाने पराभव करत नवीन विक्रमाची नोंद केली आहे. यंदाच्या आयपीएलमधील मुंबई संघाने सर्वात मोठा विजय मिळवला आहे. या विजयासह मुंबईने प्ले-ऑफमधील आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे. मुंबईने यंदा विजेतेपद जिंकल्यावर सहाव्यांदा ते हा विक्रम आपल्या नावावर करणार आहेत.