विधानसभा निवडणुकीत उद्धवसेनेची घसरगुंडी उडाली. ठाकरेंच्या शिवसेनेला केवळ २० जागा जिंकता आल्या. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं ५७ जागा जिंकल्या. गेल्या निवडणुकीत शिवसेना एकसंध असताना ठाकरेंच्या नेतृत्त्वात पक्षाला ५६ जागा जिंकता आल्या होत्या. पण मुंबईत ठाकरेंनी ताकद दाखवून दिली. १० जागा जिंकत त्यांनी शिंदेंना मुंबईत शह दिला. त्यानंतर आता दोन्ही शिवसेना महापालिका निवडणुकीसाठी तयारीला लागल्या आहेत. वांद्रे पूर्वेतील मातोश्री परिसरात दोन्ही पक्षांचे बॅनर लागले आहेत. शिंदेसेनेच्या बॅनरवर उद्धव ठाकरे शिवसैनिकाच्या हाती शिवबंधन बांधतानाचा फोटो वापरण्यात आला आहे.
शिंदेंच्या शिवसेनेकडून मातोश्रीसमोरच बॅनर (Banner) लावण्यात आले आहेत. उद्धव ठाकरे पक्षप्रवेशावेळी नेत्यांच्या हाती शिवबंधन बांधतात. त्याची खिल्ली शिंदेसेनेकडून उडवण्यात आली आहे. शिंदेसेनेच्या बॅनरवर ‘मैत्री धाग्याशी नाही, मैत्री वाघाशी’ असा उल्लेख आहे. या बॅनरवर शिंदेसेनेनं ठाकरेंच्या हातांचा फोटो वापरलेला आहे. ठाकरे शिवबंधन बांधत असल्याचा फोटो शिंदेसेनेनं मोठ्या खुबीनं वापरला आहे. या बॅनरवर एकनाथ शिंदे यांचाही फोटो आहे. बघताय काय? सामील व्हा, असं आवाहन शिवसैनिकांना करण्यात आलं आहे.
विभाग क्रमांक ७ कडून लावण्यात आलेल्या बॅनरवर (Banner) मोबाईल नंबर आणि क्यूआर कोड देण्यात आला आहे. शिवसेना परिवाराचे सदस्य होण्यासाठी मोबाईल नंबरवर मिस्ड कॉल द्या, असं आवाहन करण्यात आलेलं आहे. मुंबई महापालिका निवडणुकीआधी शिंदेसेनेनं ताकद वाढवण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. एका बाजूला माजी नगरसेवकांचे पक्षप्रवेश करुन घेतले जात असताना दुसरीकडे कार्यकर्त्यांना जोडून घेण्यासाठी सदस्य नोंदणी अभियानही जोरात राबवलं जात आहे.
शिंदेसेनेच्या बॅनरला ठाकरेसेनेनंही बॅनरनं प्रत्युत्तर दिलं आहे. वांद्र्यातील पाणी पुरवठ्याचा विषय ठाकरेसेनेनं बॅनरवर मांडला आहे. वांद्रे पूर्वेला मिळणार ५ एमएलडी अतिरिक्त पाणी, असा ठळक उल्लेख असलेले बॅनर ठाकरेसेनेकडून लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे मातोश्रीच्या अंगणातच ठाकरेसेना विरुद्ध शिंदेसेना असं बॅनरयुद्ध पाहायला मिळत आहे.
विधानसभा निवडणुकीत शिंदेसेनेनं ताकद दाखवून दिली. राज्यभर शिंदेसेना ठाकरेंच्या पक्षाला वरचढ ठरली. पण मुंबईत ठाकरेंनी ताकद दाखवून दिली. त्यांचे १० उमेदवार विजयी झाले. ठाकरेंकडे सध्या विधानसभेचे २० आमदार आहेत. यातील निम्मे आमदार मुंबईतील आहे. त्यामुळे मुंबईतील ठाकरेंच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी शिंदेंकडून हरतऱ्हेचे प्रयत्न केले जात आहेत. तर मुंबईतील वरचष्मा कायम ठेवून महापालिका ताब्यात ठेवण्यासाठी ठाकरेसेनेनं कंबर कसली आहे.