भारताने आक्रमण केलं तर अणुबॉम्ब टाकून सगळं नष्ट करु

भारतीय सैन्याने आमच्यावर हल्ला केला तर आम्ही भारतावर अणुबॉम्ब (Nuclear Bombs) टाकू. मग त्याचे परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागतील. आम्ही जगातील एक न्युक्लिअर पॉवर आहोत. युद्ध झाल्यास आम्ही अणुबॉम्ब टाकून सगळं नष्ट करु, अशी वल्गना पाकिस्तानी पंतप्रधानांचे विशेष सल्लागार राणा सनाउल्लाह यांनी केली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि राणा सनाउल्लाह यांची नुकतीच एक बैठक झाली. त्यानंतर राणा सनाउल्लाह यांनी भारताला अणुहल्ला करण्याची धमकी दिली.

पहलगाम हल्ल्याला 11 दिवस उलटल्यामुळे भारत कोणत्याही क्षणी हल्ला करेल, अशी भीती पाकिस्तानला आहे. पाकिस्तानी सैन्य त्यासाठी भारताला चिथावणीही देत आहे. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून सीमारेषेवर पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरु आहे. भारताने हल्ला करावा आणि युद्ध सुरु व्हावे, हा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. मात्र, भारताकडून सावधपणे आणि नियोजनबद्ध रितीने पावले टाकली जात आहेत. यापूर्वी भारताने सिंधू पाणी करार रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. ही कृती म्हणजे युद्ध समजले जाईल, असे पाकिस्तानने म्हटले होते. परंतु, त्यानंतर पाकिस्तानने सीमारेषेवरील शस्त्रसंधीचे उल्लंघन वगळता भारतावर थेट हल्ला करण्याची हिंमत दाखवलेली नाही.

तर दुसरीकडे पाकिस्तानकडून नेहमीप्रमाणे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर कांगावा सुरु आहे. तुर्कस्तान आणि चीनच्या माध्यमातून पाकिस्तानकडून पहलगाम हल्ल्याच्या निष्पक्ष चौकशीसाठी तयार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, भारताने अद्याप या सगळ्यावर कोणतेही भाष्य केलेले नाही. भारताचे हे मौन पाकिस्तानला अस्वस्थ करणारे आहे.