पत्नीच्या नातेवाईकांनी 30 वर्षीय तरुणाचा खून केल्याच्या प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. घरगुती वादातून पत्नीच्या माहेरच्या मंडळींनी तरुणाचा खून केल्याचं सुरुवातीला बोललं जात होतं. मात्र पत्नीचे तिच्याच सख्ख्या मावस भावासोबत अनैतिक संबंध असल्याने तिने नवऱ्याचा खून घडवून आणला, असा आरोप मयत तरुणाच्या कुटुंबीयांनी केला आहे.
जळगाव शहरातील कालिका माता मंदिर परिसरात एका हॉटेलजवळ शनिवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. आकाश पंडित भावसार असे 30 वर्षीय मयत तरुणाचे नाव आहे. आकाशच्या पत्नीच्या नातेवाईकांनी हा खून केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पाच जणांविरोधात शनीपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.
आकाशच्या पश्चात पत्नीशिवाय आई, दोन मुलं, बहीण, मेहुणा असा परिवार आहे. आकाश ट्रान्सपोर्ट नगरमध्ये गाडी भरण्याचे एजंट म्हणून काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.
काय आहे प्रकरण?
30 वर्षीय मयत तरुण आकाश भावसार याची पत्नी पूजा हिचे तिच्या सख्ख्या मावस भावासोबत अनैतिक संबंध होते, यातूनच हा खून झाल्याचा आरोप त्याची आई, बहीण आणि मेहुण्याने केला आहे. आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा आक्रमक पवित्रा आकाशच्या कुटुंबीयांनी घेतला होता.
शनिवारी सकाळी आरोपी हे आकाशला मारण्यासाठी त्याच्या मूळ गावी गेले होते. मात्र तो जळगावला असल्याची माहिती मिळाली. आकाशबद्दलची माहिती खुद्द त्याची पत्नी पूजा हिनेच दिल्याचा दावाही आकाशच्या कुटुंबीयांनी केला आहे.
शनिवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास कालिका माता मंदिर परिसरात ए वन हॉटेलजवळ आकाशला संशयित आरोपींनी गाठलं. धारदार शस्त्राने मांडीवर, छातीवर आणि गुप्तांगाला गंभीर वार केले. तो जखमी अवस्थेत असताना दोन राऊंड बंदुकीचे फायर केले. या घटनेत आकाशला प्राण गमवावे लागले. त्याच्या कुटुंबीयांनी मोठा आक्रोश केला.