‘थ्री ईडियट्स’ आणि ‘पीके’ सारखे हिट चित्रपट दिल्यानंतर आता चित्रपट दिग्दर्शक राजकुमार हिरानी आणि बॉलिवूड अभिनेता आमिर खान आता तिसऱ्यांदा एकत्र येणार आहेत. जवळपास 11 वर्षांनंतर आमिर आणि राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) एकत्र येणार आहेत. हे दोघं भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्यावर बायोपिक घेऊन येणार आहेत. आमिर आणि राजकुमारी हिरानी हे दोघं या चित्रपटावर आता काम करत आहेत. अजून या चित्रपटाचं नाव काही ठरलेलं नाही. मात्र, चित्रपटाचं शूटिंग हे ऑक्टोबर महिन्यात सुरु होऊ शकत आहे.
‘इंडियन एक्सप्रेस’नं दिलेल्या माहितीनुसार, हा चित्रपट दादासाहेब फाळके यांच्या आयुष्यावर आधारीत आहे. चित्रपटात दाखवण्यात येणार आहे की दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपटाचे जनक ही पदवी कशी मिळाली? तर याचवर्षी ऑक्टोबर महिन्यात चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. आमिर खानच्या टीमनं दिलेल्या स्टेटमेंटनुसार, 20 जून रोजी सितारे जमीन पर हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आमिर खान या चित्रपटाची तयारी सुरु करणार आहे. वीएफएक्स स्टूडियोजनं त्या काळाचे आणि पीरियेडचे एआय डिझाइन तयार केले आहेत.
या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर चार वर्षांपासून काम होतंय. रिपोर्ट्सनुसार, “राजकुमार हिरानी, अभिजात जोशी, हिंदुकुश भारद्वाज आणि आविष्कार भारद्वाज गेल्या 4 वर्षांपासून या स्क्रिप्टवर काम करत आहे. दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर श्रीकृष्ण पुसालकर या प्रोजेक्टचे समर्थक राहिलेत आणि त्यांनी दादासाहेब फाळके यांच्या आयुष्या संबंधातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या.”
दादासाहेब फाळके यांचा 1913 मध्ये प्रदर्शित झालेला ‘राजा हरिश्चंद्र’ पासून त्यांच्या सत्यवान-सावित्री पर्यंत अनेक चित्रपटांविषयी आपल्याला माहित आहे. पण त्यांच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टींविषयी कोणाला जास्त काही माहित नाही. सगळ्यांना आश्चर्याची गोष्ट म्हणजे राजकुमार हिरानी आणि आमिर खान यांच्या आधी ‘दादासाहेब फाळके’ यांच्या आयुष्यावर बायोपिक बनवण्याचा विचार कोणत्या दुसऱ्या चित्रपट दिग्दर्शक आणि निर्मात्याच्या मनात आला की नाही याविषयी जास्त माहिती नाही. आता आमिर खान आणि राजकुमार हिरानी हे या चित्रपटातून दादासाहेब फाळके यांच्याविषयी कोणत्या गोष्टी दाखवणार आहेत याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.