पुणे महापालिकेसाठी भाजप लावणार पुन्हा एकदा ‘तो’ फॉर्म्युला, पाहा कोणता ?

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राज्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या मुंबई आणि पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation)निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारी करताना दिसत आहेत. राज्यात सत्तेतील सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या भाजपने तर उमेदवारांची चाचपणी सुद्धा सुरू केली आहे. पुणे महानगरपालिकेत महायुती म्हणून लढणार की स्वबळावर लढणार याचा निर्णय अजून झालेला नसताना भाजपने आपल्या उमेदवारांची चाचपणी सुरू केली असून त्यासाठी भाजपने आपला नेहमीचा फॉर्म्युला कायम ठेवला आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे उमेदवार निवडताना भाजपकडून सर्वेक्षण करण्यात आले होते. आता पुणे महापालिका निवडणुकीत उमेदवार निवडताना सुद्धा भाजपकडून तोच फॉर्म्युला कायम ठेवत सर्व्हे करण्यात येणार आहे. इच्छुक असलेल्या मधून उमेदवारांची निवड करण्यासाठी विविध पातळ्यांवरती हे सर्व्हे करण्यात येणार आहे. त्यामुळे जो सर्व्हेमध्ये पुढे तोच उमेदवारीचा प्रमुख दावेदार असणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेश दिल्यानंतर सर्वाधिक इच्छुकांची संख्या पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षात पाहायला मिळत आहे. एका जागेसाठी सात ते आठ जण इच्छुक असल्याचे चित्र सध्या पुण्यामध्ये आहे. त्यामुळे या इच्छुकांमधून नेमका उमेदवार ठरवण्याचं मोठ टास्क भाजप पक्ष नेतृत्वासमोर आहे. त्यामुळे या इच्छुकांमधून योग्य उमेदवार निवडण्यासाठी भाजपकडून विविध पातळ्यांवर सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. हे सर्वेक्षण करण्यासाठी संस्थेची देखील नेमणूक करण्यात आल्याची माहिती आहे.

या सर्व्हेमधून उमेदवारांच्या लोकप्रियतेचा, कामगिरीचा आणि पक्षाशी असलेल्या निष्ठेचा अभ्यास केला जाणार आहे. जातीय समीकरणे देखील यामध्ये महत्त्वाचा भाग असणार आहे. त्यामुळे यंदाची महापालिकेसाठीची उमेदवारी ही सर्व्हेमधून येणाऱ्या निष्कर्षांवर दिली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे लोकप्रियता गमावलेले,जनतेशी संपर्क नसलेले किंवा कार्यक्षमतेत मागे पडलेले माजी नगरसेवकांचा पत्ता कट केला जाणार आहे. भाजपाला पुणे महापालिकेवर पुन्हा एकदा एक हाती सत्ता मिळवायची आहे. त्यामुळे उमेदवारी देताना पक्ष कोणतीही रिस्क घ्यायला तयार नाही. त्यामुळेच आता विजयाची खात्री असणाऱ्या उमेदवारांनाच तिकीट दिलं जाणार आहे आणि त्यासाठीच हे सर्वेक्षण केले जातं आहे.

कसा केला जाणार सर्व्हे ?

भाजपकडून केला जाणारा हा सर्वे तीन पातळ्यांवर असणार आहे. त्यामध्ये केंद्रीय, प्रदेश आणि संघटनात्मक पातळी असे टप्पे असणार आहेत. त्यामुळे उमेदवारी मिळवण्यासाठी भाजप इच्छुकांना तीन कसोट्यामधून जावं लागणार आहे. यापूर्वी भाजपकडून विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील उमेदवारी निश्चित करण्यासाठी अशाच प्रकारची सर्व्हे केले होते. हे सर्व्हे आधार ठरवत विधानसभेची आणि लोकसभेची उमेदवारी निश्चित करण्यात आली होती. आता हाच फॉर्म्युला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी देखील वापरण्यात येणार आहे.