राज्यात आजपासून मुसळधार पावसाचा अलर्ट, रत्नागिरीत पावसाच्या जोरदार सरी

राज्यात आजपासून मुसळधार पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. कोकण विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात आज पाऊस पडेल असे हवामान विभागाचा अंदाज आहे. तर मंगळवारपासून मराठवाडा भागात पाऊस सुरु, होईल असा ही अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मुंबईत रविवारी रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरु आहे. सोमवारी पहाटेपासूनही मुंबई पावसाच्यातुरळक सरी बरसत आहेत. तसेच आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली आहे. त्यामुळे आज मुंबईत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. या पावसामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

तर रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यात आणि आसपासच्या परिसरात सोमवारी सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली आहे. अचानक कोसळलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. मात्र, हवेत गारवा निर्माण झाला आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणातला अनेक भागात अवकाळी पाऊस पडत आहे. रविवारी संध्याकाळी सह्याद्रीच्या दऱ्याखोरांमध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये विजेचा लपंडाव सुरु आहे. मान्सून अंदमानत दाखल झाल्यानंतर आता कोकणात देखील त्याच्या आगमनाची चाहूल लागली आहे. येत्या काही दिवसांत मान्सून आधी केरळ आणि त्यानंतर कोकणात दाखल होईल.

बुलढाण्यात पावसाचा धुमाकूळ
बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा परिसरात मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ सुरु आहे. वादळी वाऱ्यासह दोन तास जोरदार पाऊस झाल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. पावसाच्या जोरदार माऱ्याने नांदुरा – बुऱ्हाणपूर मार्गावरील रेल्वे गेट नादुरुस्त झाल्याने तब्बल तीन तास वाहतूक खोळंबली होती. त्यामुळे या मार्गावर वाहनांच्या चार किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. तसेच नांदुरा परिसरात अनेक ठिकाणी घरावरील छते उडाल्याचा प्रकार पाहायला मिळाला.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. काही भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच विजांच्या कडकडाटासह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 17 ते 20 मे दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.