तिकीट आरक्षित करण्यापासून ते अगदी ते रद्द करेपर्यंत आणि रेल्वेचं वेळापत्रक एका क्लिकवर पाहण्यापर्यंतच्या सर्व सोयीसुविधा रेल्वेनं एका क्लिकवर उपलब्ध करून दिल्या. याच नव्या तंत्राच्या बळावर आता रेल्वेकडून तिकीट आरक्षण प्रक्रियेमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. खुद्द केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनीच यासंदर्भातील माहिती दिली.
आता भारतील रेल्वेकडून अखेरच्या क्षणी केल्या जाणाऱ्या तत्काळ तिकीट (Tatkal-Tickets) बुकिंगसाठी ई- आधार प्रमाणीकरण प्रणाली सुरू करण्यासाठीची तयारी करण्यात येत आहे. रेल्वे तिकीट आरक्षण प्रक्रियेमध्ये होणारा गैरव्यवहार आणि स्कॅल्पिंग कमी करण्यासाठी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
तिकीट बुकिंगदरम्यान सदर व्यक्तीची ओळख डिजीटल स्वरुपात वैध ठरवली जाणार आहे. या माध्यमातून तिकीट आरक्षण प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि निष्पक्ष करण्याचं लक्ष्य रेल्वेनं केंद्रस्थानी ठेवलं आहे. या माध्यमातून तिकीट आरक्षणात होणारा घोटाळा आणि गैरव्यवहार टाळण्यावर विशेष भर दिला जाईल. रेल्वे अधिकारीसुद्धा या योजनेबाबत आशादायी असून, तत्काळ तिकीट बुकींगमुळं चिंता असणाऱ्या प्रवाशांनाही यातून मोठा दिलासा मिळणार आहे.
सध्याची तत्काळ तिकीट आरक्षण प्रणाली कसं काम करते?
AC क्लास (2A, 3A, CC, EC आणि 3E) ची बुकिंग रेल्वे निघण्यापूर्वी एक दिवस आधी सकाळी 10 वाजता सुरू होते.
नॉन एसी (स्लीपर, सेकंड सिटींग) ची तिकीट आरक्षण प्रक्रिया रेल्वे प्रवासाच्या एक दिवस आधी सकाळी 11 वाजता सुरू होते.
उदाहरणार्थ ट्रेन 16 जुलै रोजी निघणार असेल, तर तुम्ही 15 जुलै रोजी तत्काळ तिकीट काढणं अपेक्षित असेल. यासाठी एसीची तिकिटं 10 वाजल्यापासून आणि नॉन एसीची तिकिटं 11 वाजल्यापासून उपलब्ध असतील.
तत्काळ तिकीट कन्फर्म झाल्यास कोणतंही रिफंड मिळणार नाही.
नव्या नियमामुळं नेमकं काय बदलणार?
आतापर्यंत रेल्वेचं तिकीट बुक करण्यासाठी फक्त मोबाईल ओटीपी आणि ID चीच पूर्तता करावी लागत होतीच. आसा मात्र या नव्या प्रणालीअंतर्गत आणि बदललेल्या नियमानुसार आधारकेंद्रीत e-KYC करावी लागेल. म्हणजेच तुमचा आधार क्रमांक, त्याच्याशी लिंक असणाऱ्या मोबाईलवर येणारा OTP या साऱ्याची आवश्यकता भासणार असून त्याशिवाय रेल्वे तिकीट बुक होणार नाही.
