महाराष्ट्रातील द्राक्ष निर्यातीला ब्रेक द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत 

 महाराष्ट्र हे द्राक्ष उत्पादनात देशात अग्रेसर असलेलं राज्य आहे. मोठ्या प्रमाणात राज्यात द्राक्षाचं उत्पादन घेतलं जातं. राज्यातून मोठ्या प्रमाणावर इतर देशात द्राक्षाची निर्यातही केली जाते. मात्र, सध्या द्राक्ष निर्यातील ब्रेक लागला आहे. इस्त्राईल आणि हमासमध्ये सुरु असलेल्या युद्धाची (Israel Hamas war) झळ द्राक्ष निर्यातीला बसली आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) द्राक्षांच्या निर्यातीला सध्या ब्रेक लागला आहे. गाझापट्टीजवळ जहाजांवर झालेल्या हल्ल्यामुळं सुएझ कालवा आणि लाल समुद्रातून होणारी वाहतूक बंद आहे. त्यामुळं भारतातून युरोपियन देशात होणारी द्राक्षांची निर्यात जहाज वाहतूक कंपन्यांनी थांबवली आहे.

सुएझ कालवामार्गे युरोप देशात जाण्यासाठी सात हजार दोनशे किलोमीटरचे अंतर पार करण्यास 21 दिवसांचा कालावधी लागतो. मात्र, नवीन केप ऑफ गुड होपमार्गे गेल्यास हेच अंतर 19 हजार 800 किमी एवढे होणार असून त्यासाठी किमान 34 ते 38 दिवस लागणार आहेत. त्यामुळं अर्थातच आर्थिक फटका मोठ्या प्रमाणावर बसणार असून द्राक्षही खराब होण्याची भिती आहे. एकंदरीतच ऐन द्राक्ष निर्यात हंगाम सुरु होण्याच्या तोंडावरच ही परिस्थिती उदभवल्यानं द्राक्ष निर्यातदार सध्या चिंतेत आहेत.

दरम्यान, सरकारनं यावर काहीतरी तातडीने पाऊलं उचलावीत आणि परिस्थिती पूर्वपदावर यावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. कारण यातून मार्ग नाही काढला तर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. द्राक्ष खराब होण्याची भीती शेतकऱ्यांनी वर्तवली आहे. 

गेल्या अडीच महिन्याहून अधिक काळ झालं, इस्रायल आणि हमास (Israel Hamas War) यांच्यात युद्ध सुरु आहे. युद्धात हजारो निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे.  7 ऑक्टोबर 2023 रोजी पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने इस्रायलवर हजारो क्षेपणास्रांचा मारा करत या युद्धाला सुरुवात केली होती. त्यानंतर हमासचा खात्मा करण्याासाठी इस्रायलही युद्धात उतरलं होत. अडीच महिनं झालं तरी अद्याप युद्ध सुरुच आहे. इस्रायलकडून हमासला लक्ष्य करण्यासाठी गाझा पट्टीवर सातत्याने हल्ले सुरु आहे. गाझातील नागरिकांची अवस्था फार बिकट झाली आहे. या युद्धाचा परिणाम महाराष्ट्रवरही झालेला दिसत आहेत. या हल्ल्यामुळं राज्यातील द्राक्ष उत्पादक चिंतेत आहेत.