यंदाचे मृग नक्षत्र कोरडेच गेले आहे. छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील अनेक भागाला पावसाची प्रतीक्षा आहे. उन्हाची वाढती तीव्रता सर्वसामान्य नागरिकांसह बळीराजाचा चिंतेचा विषय ठरु लागली आहे. दर वर्षी सात जून रोजी मृग नक्षत्र लागते असे मानले जाते. या नक्षत्रापासून पावसाळा खऱ्या अर्थाने सुरू होतो, असे जाणकारांचे मत आहे. मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर पाऊस थोड्या फार प्रमाणात हजेरी लावतो. पण यंदा मृग नक्षत्र त्या अर्थाने कोरडेच गेले आहे. छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील बहुतेक भागांना पावसाची प्रतीक्षा कायम आहे. जून महिन्याच्या अखेरीस पडलेल्या अवकाळी पावसामुळे संपूर्ण मराठवाड्याला चिंब केले होते. बीडचा बिंदुसरा प्रकल्प या पावसामुळे ओव्हरफ्लो झाला होता. अन्यही प्रकल्पांमधील पाण्याच्या साठ्यात वाढ झाली होती. त्यानंतर मात्र पावसाने दडी मारली आहे.
मराठवाड्यात आठ दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे पहिल्या आठवड्यात पेरणी होऊ शकली नाही. जमिनीत वाफसा आल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी केली. दहा जूनपर्यंत पेरणी करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले होते. आता मोठा पाऊस लांबणीवर गेल्यामुळे पेरणीला विलंब होणार असल्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात मोसमी पावसाने २४ दिवस दमदार हजेरी लावल्यानंतर विश्रांती घेतली आहे. गेल्या आठ दिवसांपासून पावसाची उघडीप आहे. विभागाचे एकूण पेरणी क्षेत्र ४७ लाख हेक्टर आहे. कापूस, सोयाबीन आणि मका ही प्रमुख पिके आहेत. मे महिन्यात पूर्वमोमसी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीची मशागत करण्यास वेळ मिळाला नव्हता. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. पूर्वमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांना शेतीची मशागत करण्यास वेळ मिळाला नव्हता. पाऊस थांबल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी पूर्ण केली आहे. मराठवाड्यात १९५ मिमी पाऊस झाला आहे. त्यात धाराशीव आणि लातूर जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. विभागात १२ जूननंतर पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
जिल्ह्यात ११ जूनपर्यंत तुरळक पाऊस होईल, असा अंदाज जिल्हा कृषी हवामान विभागाने व्यक्त केला आहे. रविवारी हलक्या पावसाची शक्यता आहे. जूनमध्ये साधारण पाऊस होणार असून जुलै महिन्यात पावसाचा जोर वाढणार आहे. शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेशी ओल असल्यास पेरणी करावी. दहा जूनपर्यंत पेरणी करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
