शिक्षणाचा खेळखंडोबा ! अकरावीची पहिली यादी १० जूनऐवजी २६ जूनला

दहावीची परीक्षा दरवर्षीपेक्षा १५ दिवस आधी सुरू करून, मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात निकाल जाहीर करूनही अकरावी केंद्रीभूत ऑनलाइन प्रक्रियेतील तांत्रिक अडचणींमुळे प्रवेशाचे वेळापत्रक कोलमडले. १० जूनला प्रसिद्ध होणाऱ्या पहिल्या यादीसाठी आता थेट २६ जूनपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. या दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत असून याला जबाबदार कोण, असा प्रश्न विद्यार्थी, पालकांसह शिक्षक थेट मुख्यमंत्र्यांनाच विचारत आहेत.

यंदा शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने दहावीच्या शालांत परीक्षा १५ दिवस आधीच सुरू केल्या. दहावीचा निकालही १३ मे रोजी जाहीर करण्यात आला. मात्र आता निकाल जाहीर होऊन महिना होत असूनही अकरावी प्रवेशाची पहिली यादीही जाहीर होण्याची चिन्हे नाहीत. अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या मूळ वेळापत्रकानुसार ही यादी १० जून रोजी म्हणजे मंगळवारी जाहीर होणे अपेक्षित होते. पण आता १२ लाखांहून अधिक नोंदणी झालेल्या विद्याथ्यांच्या ‘डेटा’वर प्रक्रिया करण्यासाठी किमान आठवडाभराचा अवधी लागणार असल्याने पहिली गुणवत्ता यादी २६ जून रोजी जाहीर होणार आहे.

‘दोन वर्षांपूर्वी माझ्या बहिणीचा अकरावीचा प्रवेश सप्टेंबरमध्ये झाला होता. यंदा आमच्या परीक्षा आणि निकाल लवकर झाल्याने प्रवेश प्रक्रिया आणि महाविद्यालयातील वर्ग लवकर सुरू होईल, असे वाटले होते. पण आता २६ जूनला पहिली यादी जाहीर होणार आहे. त्यामुळे ऑगस्टमध्ये तरी महाविद्यालये सुरू होतील का,’ असा प्रश्न डोंबिवलीतील सोहम मंत्री या विद्यार्थ्याने उपस्थित केला. सोहमच्या वडिलांनीही या खेळखंडोब्याबद्दल खेद व्यक्त केला. ‘सरकार आणि शालेय शिक्षण विभाग विद्यार्थी आणि पालकांना गृहित धरत आहेत,’ अशी टीका त्यांनी केली.

‘विभागाने परीक्षा लवकर घेण्यासाठी आणि निकाल लवकर लावण्यासाठी संपूर्ण राज्यातील शिक्षकांना वेठीस धरले. शिक्षकांकडून निकाल लावण्यात दिरंगाई झाली असती, तर त्यांच्यावर बडगा उगारला असता, पण आता प्रवेश प्रक्रियेत दिरंगाई होताना मुख्यमंत्री शालेय शिक्षणमंत्र्यांना, त्यांच्या हाताखालील अधिकाऱ्यांना जबाबदार धरणार का,’ असा प्रश्न महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे माजी उपाध्यक्ष महेंद्र गणपुले यांनी उपस्थित केला.

‘अकरावी प्रवेश प्रक्रियेत तांत्रिक अडचणींमुळे दिरंगाई होत असल्याची वस्तुस्थिती माहित आहे. आम्ही हा निर्णय चांगल्या भावनेतून, विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक टाळण्यासाठी घेतला होता, पण अनेक तांत्रिक मुद्दे विचारात घेऊन त्यावर तोडगा काढणे आवश्यक आहे. त्यासाठी आज, सोमवारी तातडीने बैठक घेतली जाईल,’ असे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.

‘राज्यभर केंद्रीभूत ऑनलाइन प्रवेश राबवण्याचे हे पहिलेच वर्ष आहे. १२ लाख विद्याथ्यांच्या ‘डेटा’वर प्रक्रिया करण्यासाठी संस्थेला किमान आठ दिवसांचा अवधी हवा आहे. त्यामुळे आम्ही वेळापत्रकात बदल केला. मात्र अकरावीचे वर्ग ११ ऑगस्ट किंवा महाविद्यालयातील ५० टक्के प्रवेश यापैकी जे आधी होईल, त्या वेळी सुरू करण्याचे स्वातंत्र्य आम्ही महाविद्यालयांना देणार आहोत. विद्याथ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी दिवाळी सुट्टीत कपात केली जाऊ शकते,’ असे माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालनालयाचे प्रभारी संचालक डॉ. श्रीराम पानझडे यांनी स्पष्ट केले.

यंदाची अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या आधी पूर्ण होणार नाही, अशी चिन्हे आहेत. दरवर्षी या विद्यार्थ्यांचे अकरावी शैक्षणिक वर्षाचे नुकसान होते. पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाबद्दल आस्था बाळगणारा शिक्षण विभाग या विद्यार्थ्यांचे नुकसान टाळणार का ?