सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचं वयाच्या ७५व्या वर्षी निधन, मृत्यूच्या एक दिवसापूर्वीच साजरा केलेला वाढदिवस

९० च्या दशकात भारतीय चित्रपटसृष्टीतील मोठ्या चित्रपटांचे दिग्दर्शक (Drector) आणि चित्रपट निर्माते पार्थो घोष यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालंय. अभिनेत्री ऋतुपर्णा सेनगुप्ता यांनी या याबद्दल माहिती दिली. ‘अग्नि साक्षी’ (१९९६), ‘गुलाम-ए-मुस्तफा’ (१९९७), ‘तीसरा कौन?’ (१९९४) आणि ‘युगपुरुष’ (१९९८) सारख्या चित्रपटांनी पार्थो घोष यांचं नाव चित्रपटाच्या इतिहासात नोंदवले गेलंय. त्यांच्या सिनेमांच्या कथा प्रत्येक पिढीला साजेशा असतात.

सेनगुप्ता यांनी लिहिलं की, ‘माझ्या शब्दांच्या पलीकडे माझं मन दुखावलं आहे. आम्ही एक चांगली व्यक्ती, एक दूरदर्शी दिग्दर्शक आणि एक दयाळू आत्मा गमावला आहे. पार्थो दा, तुम्ही पडद्यावर पसरवलेल्या जादूसाठी तुम्हाला कायमच लक्षात ठेवलं जाईल. तुमच्या आत्म्यास शांती लाभो.’

पार्थो घोष यांचे वेगवेगळ्या विषयांचे सिनेमे असायचे. मनीषा कोइराला, जॅकी श्रॉफ आणि नाना पाटेकर अभिनीत त्यांचा ‘अग्नि साक्षी’ हा चित्रपट घरगुती हिंसाचाराच्या विषयावर आधारित सिनेमा होता आणि या सिनेमाचं खूप कौतुकदेखील झालं. नाना पाटेकर आणि रवीना टंडन यांचा ‘गुलाम-ए-मुस्तफा’ हा चित्रपट अजूनही एक कल्ट क्लासिक असून या सिनेमामध्ये अंडरवर्ल्डची कथा दाखवली आहे. पार्थो घोष यांचे चित्रपट केवळ बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाले नाहीत तर त्यांनी सामाजिक मुद्द्यांवर जागरूकता पसरवण्याचं कामही केलं. वास्तववाद आणि चित्रपटसृष्टीतील आकर्षण यांचा समतोल असलेली त्यांची शैली अजूनही येणाऱ्या चित्रपट दिग्दर्शकांना प्रेरणा देते. त्यांचे चित्रपट अजूनही प्रेक्षकांच्या हृदयात आहेत आणि हाच त्यांचा खरा आदर आहे. पार्थो घोष आपल्यात नसले तरी त्यांचे सिनेमे नेहमीच जिवंत राहतील.

त्यांनी अनेक हिंदी आणि बंगाली टेलिव्हिजन शो दिग्दर्शित केले. पार्थो यांनी १९९४ मध्ये सेनगुप्ताची हिंदी प्रेक्षकांशी ओळख करून दिली. अलीकडेच, ते ‘१०० डेज’ आणि ‘अग्निसाक्षी’च्या सिक्वेलवर काम करत होते. पार्थो दा यांनी त्यांच्या मृत्यूच्या एक दिवस आधी त्यांचा ७५ वा वाढदिवस साजरा केला.