हमदाबादहून लंडनच्या दिशेने निघालेल्या एअर इंडिया एआय-171 विमानाला गुरुवारी भीषण अपघात झाला. गुरुवारी दुपारी सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर केवळ काहीच मिनिटांत एअर इंडियाचे विमान मेघानीनगर परिसरात कोसळले. या भीषण दुर्घटनेत 241 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर यात 12 क्रू मेंबर्सचा देखील समावेश आहे. या अपघातात भरूचच्या भूमी चौहान या थोडक्यात बचावल्या आहेत.
भूमी (Bhoomi) चौहान लंडनला जाण्यासाठीची आपली फ्लाइट पकडण्यास अवघ्या 10 मिनिटांनी उशिरा पोहोचल्या आणि त्यामुळे एअर इंडियाने त्यांना चेक-इन करू दिलं नाही. त्या यासाठी सीआयएसएफच्या जवानांशी वाद घालत होत्या, बरीच चर्चा झाली, पण सुरक्षेच्या नियमांमुळे एअरपोर्ट अधिकाऱ्यांनी त्यांना परवानगी दिली नाही. यामुळे भूमी खूपच निराश झाल्या होत्या. मात्र, काही वेळाने जेव्हा त्याच विमानाच्या अपघाताची बातमी त्यांनी ऐकली, तेव्हा त्या अक्षरशः सुन्न झाल्या.
भूमी चौहान यांनी न्यूज एजन्सी एएनआयशी बोलताना म्हटले आहे की, मी काल लंडनला परत जात होते. माझ्या फ्लाइटचं वेळापत्रक दुपारी 1:10 वाजताचं होतं, पण मी एअरपोर्टवर पोहोचले तोपर्यंत 12:20 वाजले होते. त्याच्या 10 मिनिटांपूर्वी म्हणजेच 12:10 वाजता एअर इंडियाने चेक-इन बंद केलं होतं. चेक-इनच्या गेटवर पोहोचल्यानंतर मी अनेक वेळा विनंती केली की मला आत जाऊ द्या, मला केवळ 10 मिनिटांचाच उशीर झालाय. इमिग्रेशन आणि इतर सगळ्या औपचारिकता मी पटकन पूर्ण करून घेईन, असं त्यांनी सांगितलं. पण सुरक्षारक्षक आणि एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी मला परत पाठवल्याची माहिती त्यांनी दिली.