एमपीएससीचा महत्वाचा निर्णय; परीक्षार्थ्यांसाठी ‘केवायसी’ प्रक्रिया बंधनकारक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीत कोणताही अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना ‘केवायसी’ (KYC) प्रक्रिया पूर्ण करणे सक्तीचे करण्यात आले आहे, अशी माहिती एमपीएससीने दिली आहे. एमपीएससीने दिलेल्या माहितीनुसार, उमेदवारांना पुढील चारपैकी कोणत्याही एका पद्धतीने ओळख पडताळणी करावी लागणार आहे:

  • आधार ऑनलाईन ई-केवायसी,
  • आधार ऑफलाईन पेपरलेस डिजिटल केवायसी,
  • आधार ऑफलाइन पेपर आधारित केवायसी,
  • नॉन-आधार ऑफलाइन केवायसी या चार पद्धतीने ओळख पडताळणी करता येणार आहे.

अर्ज करण्याआधीच ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असेल. याशिवाय, एकदाच नोंदणी करताना उमेदवाराने आपला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी प्रणालीत नोंदवणेही आवश्यक आहे. जर उमेदवाराने आधार आधारित पडताळणी निवडली, तर आधार क्रमांकाशी संलग्न मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. ही प्रणाली लागू केल्यामुळे उमेदवारांची ओळख अचूकरीत्या प्रमाणिकरण करता येणार असून, फसवणूक आणि चुकीच्या माहितीला आळा बसेल.