मुंबईत दर दिवशी लाखोंच्या संख्येनं नागरिक नोकरीच्या निमित्तानं घराबाहेर पडतात. बँकेपासून ते अगदी सरकारी दालन (Government Offices) असो किंवा मग खासगी कार्यालय असो. ठरलेल्या वेळांमध्ये, ठरलेल्या मार्गानं ही मंडळी आपआपल्या कार्यालयांमध्ये पोहोचत असतात. सहसा सकाळी 9, 10 ते सायंकाळी 5-7 अशा वेळांमध्येच बहुतांश मंडळींच्या कार्यालयीन वेळा असतात. आता मात्र याच वेळांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे आणि यास कारणीभूत ठरत आहे ते म्हणजे एक पत्र.
ऑफिसच्या वेळा बदलण्याची ही गरज भासली आहे ती म्हणजे मुंबईतीली आणि प्रामुख्यानं मुंबई लोकलमधील वाढत्या गर्दीमुळं. मध्य रेल्वेने मुंबईतील जवळपास 800 शासकीय आणि खासगी कार्यालयांना त्यांच्या कार्यालयीन वेळेमध्ये बदल करण्यासंदर्भात एक पत्र पाठवलं आहे.
सकाळ आणि संध्याकाळच्या ठराविक वेळांमध्ये उपनगरीय लोकलमधील गर्दीची वाढती आणि तितकीच गंभीर स्वरुप धारण करणारी समस्या सोडवण्यासाठी हे विनंतीपर पत्र पाठवण्यात आलं आहे. कार्यालयीन वेळांत टप्प्याटप्प्याने बदल करण्यासाठीची विनंती करत सदर मुद्द्यावर राज्य सरकारनेही हस्तक्षेप करावा, अशी विनंती या पत्रातद्वारे करण्यात आली आहे.
बहुसंख्य नागरिक नोकरीधंद्यासाठी दर दिवशी दूरचा प्रवास करत मुंबई गाठतात. ज्यामुळं लोकल ट्रेन मार्गावर सातत्यानं ताण वाढू लागला आहे. या गर्दीची विभागणी करण्याच्या दृष्टीने लोकल सेवांमध्ये वाढ करण्यासाठी नवीन मार्गिका तयार करण्याचा एक पर्याय आहे. मात्र, सीएसएमटी ते कल्याणपर्यंत नवी रेल्वे मार्गिका टाकण्यासाठीची जागाच नसल्यामुळं कार्यालयीन वेळांमध्ये बदल करण्याचाच पर्याय प्रशासनाकडे उरल्याचं म्हणायला हरकत नाही.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात दर दिवशी 1810 लोकल चालवल्या जातात. या लोकलमधून साधारण 35 लाखांहून अधिक प्रवासी अपेक्षित ठिकाणी पोहोचण्यासाठी प्रवास करतात. स्वस्त आणि जलद वाहतूक सेवा असल्या कारणानं अनेकांचच या माध्यमाला प्राधान्य मिळत असून रेल्वेत प्रवाशांची गर्दी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
गर्दी वाढत असली तरीसुद्धा मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते ठाणे (THANE) परिसरातील विविध सरकारी कार्यालये आणि खासगी कार्यालयांच्या वेळांत नियोजनाचा अभाव असल्या कारणानं सर्व उपनगरीय लोकलमध्ये सकाळी आणि सायंकाळी तुडूंब गर्दी होते. यातून अनेकदा गोंधळाची आणि काही प्रसंगी तणावाची परिस्थितीसुद्धा निर्माण होते. याच गर्दीचं विभाजन करत कोणताही अनूचित प्रकार होऊ नये यासाठी गर्दी कमी करून करण्यासाठी, कार्यालयीन वेळांमध्ये बदल करणं आवश्यक असल्याचं रेल्वेकडून पाठवण्यात आलेल्या या म्हटलं गेलं आहे.
रेल्वे विभागाच्या वतीनं केंद्र आणि राज्य सरकारी कार्यालयं, कॉर्पोरेट अर्थात खासगी कार्यालयं, विविध महामंडळं, बँका, महापालिका, महाविद्यालयं, इत्यादींनी कार्यालयीन वेळेत टप्प्याटप्प्याने बदल करण्याचा विचार करावा, असं सुचवण्यात आलं आहे.
