हिंदी भाषा सक्तीचा वाद सुप्रीम कोर्टात

राज्यातील मराठी आणि हिंदी भाषेचा वाद आता सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) पोहोचला आहे. हिंदी सक्तीविरोधात आक्रमक विधानं केल्याने राज ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंविरोधात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील घनश्याम उपाध्याय यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी मागणी केली आहे की, हिंदी भाषिक लोकांविरुद्ध हिंसाचार भडकवल्याबद्दल आणि भाषेवर आधारित द्वेष पसरवल्याबद्दल मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेत ठाकरे आणि त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात हिंदी भाषा सक्तीवरुन वाद सुरु झाल्यानंतर ठाकरे बंधू भाषेच्या मुद्द्यासाठी एकत्र आले. पण शासनाने हिंदी भाषा सक्तीचा निर्णय रद्द केला.त्यानंतर ठाकरे बंधूंनी मराठी भाषेसाठीचा विजयी मेळावा आयोजित केले, जेथे संपूर्ण कुटुंब एका व्यासपीठावर आले. यातच मिरारोड मध्ये मनसैनिकांनी हिंदी भाषिक व्यापाऱ्यांना कानशि‍लात लगावल्याचा प्रकार समोर आला. यावर राज ठाकरेंनी मिरारोड येथील सभेतून इशारा दिला की, ‘कानावर मराठी समजत नसेल तर कानाखाली मराठी बसणारच. दुकानदार, व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला. काय गरज होती मोर्चाची? तुमच्या कानशि‍लात मारली होती? अजून नाही मारलेली,’ अशा धमकीवजा सुरात ते म्हणाले.

व्यावसायिकाला झालेल्या मारहाणीचे राज ठाकरेंनी या विधानातून समर्थन केल्याचे दिसते. राज ठाकरे यांनी असेही म्हटले होते की, जेव्हा तुम्ही असे करता तेव्हा व्हिडिओ बनवू नका. महाराष्ट्रात अमराठी भाषिकांवर हात उचलल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मीरा रोडनंतर पुण्यातील एका व्यक्तीला राज ठाकरेंवर टीका केल्याबद्दल माफी मागावी लागली. सुशील केडिया यांच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली. एवढेच नाही तर, पालघरमध्ये एका ऑटो रिक्षाचालकाला मारहाण करण्यात आली.

या सर्व प्रकारांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्याविरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (एनएसए) कारवाई आणि एफआयआर नोंदवण्याची मागणी करणारे पत्र राज्याच्या पोलिस महासंचालकांना (डीजीपी) लिहिले गेले आहे. ‘मराठी विजय मेळाव्यात दिलेल्या कथित प्रक्षोभक भाषणाबाबत मुंबई उच्च न्यायालयातील वकील पंकज कुमार मिश्रा, नित्यानंद शर्मा आणि आशिष राय यांनी न्यायालयात धाव घेतली. ठाकरे यांचे भाषण द्वेष पसरवणारे आणि हिंसाचाराला चिथावणी देणार असल्याचे वकिलांनी नमूद केले आणि उच्चस्तरीय चौकशीची मागणीही केली आहे.