अजित पवार कृषिमंत्री होणार ? शरद पवारांच्या आमदारानेच केली मागणी

माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी जर मी ऑनलाइन रमी खेळत असेन आणि दोषी सापडलो तर नागपूरच्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री यांच्यातील कोणीही निवेदन करावं. त्या क्षणी न थांबता, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना न भेटता राज्यपालांकडे मी माझा राजीनामा सादर करेन असं जाहीर केलं आहे. या सर्व घडामोडींदरम्यान रोहित पवार यांनी अजित पवारांनी कृषिमंत्रीपद घ्यावं अशी माहणी केली आहे.

“सीबीआय, सीआयडी एवढंच काय इंटरपोलच्या माध्यमातून चौकशी केली तरी सभागृहात महत्वाची चर्चा सुरु असताना कृषीमंत्री पत्ते खेळत होते, हे सत्य बदलणार नाही. त्यामुळं बेलगाम कृषिमंत्र्यांचा राजीनामा घेण्याची संपूर्ण राज्याची भावना असली तरी अजितदादा आणि फडणवीस साहेबांची राजकीय अपरिहार्यता नेमकी काय आहे, हे कळत नाही. राजकीय अपरिहार्यता असावी पण जनतेच्या भावनांचा उद्रेक होणार नाही इतकीही नसावी,” असा सल्ला त्यांनी दिला आहे.

“महत्त्वाचं म्हणजे कृषी खात्याची जबाबदारी आज सक्षम आणि संवेदनशील मंत्र्याकडं असणं गरजेचं असल्याने अर्थमंत्र्यांनी स्वतःच कृषी खात्याचीही जबाबदारी सांभाळावी, हेच शेतकऱ्यांच्या हिताचं ठरेल,” असंही मत त्यांनी मांडलं आहे.

दरम्यान कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपण सभागृहात रमी खेळतानाचा आरोप फेटाळून लावला. आपण जाहिरात स्कीप करत असताना, फक्त 18 सेकंदाचा व्हिडीओ शेअर करुन आरोप प्रत्यारोप केले जात असल्याचाही दावा त्यांनी केला आहे. त्यानंतरचा व्हिडीओ जाणुनबुजून शेअर करण्यात आला नसल्याचा त्यांचा आरोप आहे. यानंतर रोहित पवार यांनी एक नवा व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ 22 सेकंदाचा आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून रोहित पवारांनी माणिकराव कोकाटेंचा दावा फेटाळून लावला.

हा व्हिडीओ शेअर करताना रोहित पवारांनी लिहिलं आहे की, “सभागृहाचं कामकाज संपलं होतं हे कृषिमंत्री महोदयांचं विधान धडधडीत खोटं आहे. उलट विकासाच्या मूळ प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासी बांधवांना दुधाळ जनावरं देण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सभागृहात चर्चा सुरु होती, पण ‘ओसाड गावच्या पाटलांना’ या चर्चेत रस नसावा आणि मला सांगा पत्त्याची कोणती जाहिरात skip करण्यासाठी ४२ सेकंद लागतात हो?”.

“विधिमंडळाची अप्रतिष्ठा होऊ नये म्हणून आवाज असलेले हे व्हिडिओ शेअर करणं मी टाळत होतो, पण मंत्री महोदयांनी कोर्टात जाण्याची भाषा केल्याने नाईलाजाने मला सत्य जनतेच्या कोर्टात आणावं लागतंय.. आता चौकशी करायचीच तर कृषीमंत्री पत्ते खेळत होते की नाही याचीही चौकशी करावी आणि ही चौकशी निष्पक्ष पद्धतीने होण्यासाठी नैतिकता दाखवून कोकाटे साहेबांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. महत्त्वाचं म्हणजे सत्य हे झाकणार नसल्याने राजीनामा देण्यासाठी पुढील अधिवेशनाची कशाला वाट पाहता आणि शेतकऱ्यांना सहन करायला लावता?,” अशी विचारणाही त्यांनी केली आहे.