महायुती सरकारमधील तब्बल आठ मंत्र्यांना नारळ दिला जाणार असल्याचा सनसनाटी दावा सामनामधून करण्यात आला आहे. त्यामुळे सरकारमध्ये सर्व काही आलबेल आहे का? अशी चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वादगस्त मंत्र्यांविषयी नाराजी व्यक्त केली असतानाच आता सामनामधून करण्यात आलेला दाव्याने भूवया उंचावल्या आहेत. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहून नार्वेकर (Rahul Narvekar) यांना मंत्रीपदी संधी मिळणार असल्याचेही सामनामध्ये म्हटले आहे. त्यांच्या जागी गेल्या काही दिवसांपासून सरकार विरोधातच भूमिका घेतलेल्या माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिपदी विधानसभा अध्यक्षपदी संधी दिली जाईल असाही दावा सामनामध्ये करण्यात आला आहे.
राहुल नार्वेकर यांनी सांगितले की, माध्यमांमधील बातम्यांवर आपला विश्वास नसून पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास आहे.त्यांनी पुढे सांगितले की पक्ष देईल ती जबाबदारी मी स्वीकारण्यासाठी तयार असून जी पक्षाची इच्छा असेल ती माझी इच्छा असेल, असे त्यांनी सांगितले. मंत्र्यांना डचू देणार आहे त्या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, सगळे चांगले काम करत आहेत. मात्र पक्षाचा निर्णय सर्वांना मान्य असेल असे ते म्हणाले. मंत्रीपद मिळाल्यानंतर आनंद होईल का? असे विचारले असता तर म्हणाले की मला देईल ती जबाबदारी मी पार पाडणार आहे. विधानसभा अध्यक्ष असेन काय किंवा मंत्री असलो काय शेवटी जनतेसाठीच करायचं असल्याचं राहुल नार्वेकर म्हणाले. विधानसभा अध्यक्ष म्हणून आपण क्रांतिकारक निर्णय घेतल्याचेही नार्वेकर म्हणाले. अधिवेशनामध्ये 152 लक्षवेधी मांडण्यात आल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे मी माझ्या पदावर चांगल्या पद्धतीने काम करत आहे. इतर जबाबदारी मिळाली तर ती सुद्धा पार पाडू, अध्यक्ष म्हणून मी माझ्या कामावरती संतुष्ट असून जेव्हा केव्हा मंत्रीपदाची माळ पडेल त्यावेळी पाहू, असेही ते म्हणाले.
