उत्तराखंडच्या (Uttarakhand) उत्तरकाशी भागात येणाऱ्या धराली इथं ढगफुटी झाल्यानं निसर्ग कोपला आणि या भागातील नदी नाल्यांना पूर आला. पाणयाचे प्रचंड लोट डोंगरकडे तोडून गावांमध्ये शिरले आणि पाहता गावंच्या गावं, घरं, हॉटेलं पाण्याच्या ताकदीनं उध्वस्त झाले. वाहत आलेल्या चिखलाच्या ढिगाऱ्याखाली अनेक नागरिकही सापडले, तर काहींनी जीव मुठीत घेऊन आक्रोश करत या संकटापासून पळ काढला.
मंगळवारी सकाळी उत्तराखंडमध्ये आलेल्य़ा या संकटानंतर त्याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले आणि अनेकांचाच थरकाप उडाला. सध्या उत्तराखंजडमध्ये सुरू असणाऱ्या चारधाम यात्रेच्या निमित्तानं आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या अशा या राज्यामध्ये बाहेरील राज्यांतील नागरिकांचीही उपस्थिती असून, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि उत्तराखंड शासनाकडून सर्वच प्रभावित क्षेत्रांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्याचं काम तातडीनं हाती घेण्यात आलं.
प्राथमिक माहितीनुसार महाराष्ट्रातील नांदेडचे दहा पर्यटक सध्या उत्तराखंडमध्ये अडकले असून पाऊस आणि त्यानंतर नद्यांना आलेल्या पुरामुळं जीव वाचवत सुखरूप ठिकाणी पोहोचण्यासाठी तब्बल 25 किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागला. काही रस्ते नष्ट झाल्यानं आणि काही रस्ते बंद झाल्यामुळं जीव वाचवण्यासाठी या पर्यटकांना सुखरुप ठिकाणी पोहोचण्यासाठी म्हणून ही पायपीट करावी लागली. ज्यानंतर दहापैकी 7 प्रवासी एका ठिकाणी तर 3 प्रवासी दुसऱ्या ठिकाणी पोहोचल्याची माहिती समोर आली. नांदेडच्या बिलोली येथील सचिन पत्तेवार यांनी सदर घटनेचा व्हिडीओ शेअर केला जिथं त्यांनी आपण सध्या सुखरुप असून सरकारकडून आपल्याला लवकरात लवकर मदत मिळावी अशी विनंती केली.
उत्तराखंडमध्ये झालेली ढगफुटी आणि त्यानंतरचा पूर पाहता उत्तरकाशी जिल्ह्याकडून तातडीनं आपात्कालीन हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आले. तुमच्या ओळखीत कोणीही उत्तराखंडमध्ये असल्यास त्यांच्यापर्यंत हे दूरध्वनी क्रमांक पाठवा…
