भारतातील सर्व विमानतळांवर सध्या हाय अलर्ट (High alert) जारी करण्यात आला आहे. संभाव्य दहशतवादी धोक्याच्या इशाऱ्यानंतर भारतातील सर्व विमानतळांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 दरम्यान दहशतवादी किंवा समाजविरोधी घटक यांच्याकडून संभाव्य धोक्यामुळे नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो ने सर्व संबंधितांना विमानतळांवर सुरक्षा वाढवण्याचे निर्देश दिले आहेत.
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या सुरक्षा शाखेने 4 ऑगस्ट रोजी काही सूचना जारी केल्यात, ज्यामध्ये सर्व विमान वाहतूक सुविधांवर त्वरित देखरेख वाढवण्याचे आवाहन करण्यात आले होते. यामध्ये विमानतळ, हवाई पट्टे, हेलिपॅड, फ्लाइंग स्कूल आणि प्रशिक्षण संस्थांचा समावेश आहे. जिथे वाढीव सुरक्षा तात्काळ वाढवून उपाययोजना विलंब न करता अंमलात आणल्या पाहिजेत. असेही सांगण्यात आलंय.
पुढे आलेल्या माहितीनुसार, येत्या 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 दरम्यान असामाजिक घटक किंवा दहशतवादी गटांकडून विमानतळांवर संभाव्य धोका असल्याचे केंद्रीय सुरक्षा एजन्सीकडून कळवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे, सर्व विमानतळांवरील सर्व भागधारकांना विमानतळ, हवाई पट्टे, हवाई क्षेत्रे, हवाई दल स्थानके, हेलिपॅड यासारख्या सर्व नागरी विमान वाहतूक प्रतिष्ठानांवर सुरक्षा उपाययोजना वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे बीसीएएसने एका अहवालात म्हटले आहे.
सर्व विमान वाहतूक सुविधांवरील सुरक्षा कर्मचाऱ्यांना 24/7 हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यात टर्मिनल, पार्किंग क्षेत्रे आणि इतर संवेदनशील क्षेत्रांभोवती तीव्र गस्त घालण्यात येईल. स्थानिक पोलिस दलांशी समन्वय साधून विमानतळांसह शहराच्या किनाऱ्यावरील सुरक्षा वाढवणे देखील आवश्यक आहे. हा सल्ला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनाही लागू आहे. ज्यामध्ये व्यावसायिक उड्डाणांवर लोड करण्यापूर्वी सर्व माल आणि त्यासाठी कडक सुरक्षा तपासणी अनिवार्य केली जाईल.
