पुनर्विकास प्रकल्पांसंदर्भात ग्राहकांच्या फायद्याचा एक मोठा निर्णय लवकरच बंधनकारक केला जाणार आहे. राज्यातील सर्वच पुनर्विकास प्रकल्पात विकासकाने रहिवाशांना तीन वर्षांचे आगाऊ भाडे व पुढील प्रत्येक वर्षांचे भाडे स्वतंत्र बैंक खात्यात जमा करावे, अशी शिफारस राज्याच्या गृहनिर्माण धोरणात करण्यात आली असून याबाबत लवकरच प्रस्ताव सादर होण्याची शक्यता आहे.
झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात दोन वर्षांचे आगावू भाडे व पुढील वर्षांसाठी धनादेश जमा करण्याची पद्धत रुढ करण्यात आली आहे. आता त्या पुढे जाऊन सर्वच प्रकल्पात तीन वर्षांचे भाडे जमा करण्याची तरतूद केली जाणार आहे. पुनर्विकास प्रकल्प साधारणतः तीन ते चार वर्षांत पूर्ण होत असल्यामुळे तीन वर्षांचे भाडे दिले गेले तर ते संयुक्तिक ठरेल. त्यानंतरही प्रकल्प रखडला तर पुढील प्रत्येक वर्षाचे भाडे स्वतंत्र बँक खात्यात जमा केल्यास रहिवाशांवर रस्त्यावर येण्याची पाळी येणार नाही, असे गृहनिर्माण विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले.
राज्यात सध्या पुनर्विकासाचे जोरदार वारे वाहत आहेत. त्याचवेळी रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांची संख्याही लक्षणीय आहे. पुनर्विकास प्रकल्प रखडल्यास भाडे बंद झाल्याने रहिवासी रस्त्यावर येतात. त्यामुळे पुनर्विकास प्रकल्पात रहिवाशांची संक्रमण शिबिरात व्यवस्था किंवा आगाऊ भाडे देणे आवश्यक असल्याचे गृहनिर्माण धोरणातही प्रस्तावीत करण्यात आले आहे.
घरांची अधिकाधिक निर्मिती करण्यावर राज्य सरकारने भर दिला असून केवळ महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणच (म्हाडा) नव्हे तर महापालिका, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणासोबत आता शहर औद्योगिक विकास मंडळ (सिडको), महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास मंडळ (एमआयडीसी), राज्य रस्ते विकास महामंडळ, महाप्रीत आदीवर घर निर्मितीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या मंडळांना अद्याप नियोजन प्राधिकरणाचे अधिकार नसले तरी निविदेद्वारे विकासक नेमण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. अशावेळी सर्व प्रकारच्या पुनर्विकास प्रकल्पात एकसमानता असावी, यासाठी ही योजना प्रस्तावीत करण्यात आल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले.
