मोहोळ तालुक्यातील हराळवाडीचे ज्ञानेश्वर हिप्परकर हे असेच प्रयोगशील शेतकरी (Farmer) आहेत. गेल्या अनेक वर्षापासून कमी क्षेत्रात पिके घेऊन ते लाखात नफा मिळवत आहेत. अवघ्या आठ गुंठे वांग्याच्या शेतीतून त्यांनी अडीच लाखांची कमाई केलीये.
हराळवाडी गावातील शेतकरी ज्ञानेश्वर हिप्परकर हे गेल्या तीन ते चार वर्षापासून आठ गुंठ्यामध्ये वांग्याची सेंद्रिय पद्धतीने शेती करत आहेत. जानेवारी महिन्यात ज्ञानेश्वर यांनी आठ गुंठ्यात वांगी लावली. सात फुटावर वांग्याची लागवड केली असून त्यामधील अंतर तीन फुटावर आहे. त्यात 380 कॅरेट वांग्याची तोड झाली असून पाचशे रुपये प्रमाणे एका कॅरेटला भाव मिळाला होता.
वांग्याची आठवडी बाजारात विक्री
ज्ञानेश्वर हे वांग्याची तोडणी केल्यावर आठवडी बाजारामध्ये त्याची विक्री करतात. त्यासाठी ते स्वत: दुचाकीवरून आठवडी बाजारा गाठतात. वांग्याची शेती करून त्याची स्वत:चा विक्री करत असल्याने त्यांना यातून भरघोस नफा मिळत असल्याचे ज्ञानेश्वर सांगतात.
आठ गुंठ्यात अडीच लाख
वांग्यावर अळीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून वेळोवेळी फवारणी केली जाते. परंतु पावसाळ्यामध्ये वांग्याच्या पिकाला अळीचा जास्त धोका असतो. आठ गुंठ्यामध्ये वांगी लागवड करण्यासाठी 30 ते 40 हजार रुपये खर्च आला आहे. तर त्याच्या विक्रीतून आतापर्यंत अडीच लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न मिळाले आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांनी नियोजनबद्ध शेती करावी. कमी क्षेत्रातील शेतातून देखील चांगला नफा मिळवता येतो. फक्त पिके निवडताना योग्य निर्णय घ्यावा, असा सल्ला शेतकरी ज्ञानेश्वर हिप्परकर देतात.
