देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) ने तरुणांना सुवर्णसंधी दिली आहे. बँकेने ज्युनियर असोसिएट्स च्या 5,583 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 6 ऑगस्टपासून सुरू झाली आहे आणि 26 ऑगस्टच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहील. म्हणजेच उमेदवारांना सुमारे तीन आठवड्यांचा वेळ आहे.
या पदांसाठी उमेदवार पदवीधर असणे अनिवार्य आहे. यासोबतच, किमान वय 20 वर्षे आणि कमाल वय 28 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. म्हणजेच, जर तुमचे वय 20 ते 28 वर्षांच्या दरम्यान असेल आणि तुम्ही पदवी पूर्ण केली असेल, तर तुम्ही या भरतीमध्ये(recruitment) अर्ज करु शकता.
किती पगार दिला जाईल?
SBI ज्युनियर असोसिएट पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना आकर्षक पगार मिळेल. सुरुवातीचा मूळ पगार 26,730 रुपये प्रति महिना निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये 24,050 रुपये मूळ वेतन आणि पदवीधर उमेदवारांना दोन अतिरिक्त वेतनवाढ समाविष्ट आहे. जर भत्ते आणि सुविधा जोडल्या तर मुंबईसारख्या महानगरांमध्ये एकूण सुरुवातीचा पगार सुमारे 46000 रुपयांपर्यंत पोहोचेल. महागाई भत्ता (डीए), घरभाडे भत्ता (एचआरए), वैद्यकीय आणि प्रवास भत्ता सारख्या सुविधा देखील त्यामध्ये दिल्या जातात. तथापि, पोस्टिंग शहरानुसार पगारात थोडा फरक असू शकतो.
अर्ज शुल्क किती आहे?
अर्ज करण्यासाठी उमेदवाराला अर्ज शुल्क भरावे लागेल. सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांसाठी शुल्क 750 रुपये ठेवण्यात आले आहे. तर एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांसाठी अर्ज मोफत आहे.
अर्ज कसा करायचा?
सर्वप्रथम SBI च्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जा आणि करिअर विभागात “चालू पदे” वर क्लिक करा.आता ज्युनियर असोसिएट्स भरती 2025 च्या लिंकवर जा आणि “आता अर्ज करा” वर क्लिक करा. येथे “नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा” वर क्लिक करा आणि नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सारखी आवश्यक माहिती भरून नोंदणी करा. यानंतर तुमची शैक्षणिक माहिती, फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.शेवटी विहित अर्ज शुल्क भरा आणि फॉर्म सबमिट करा.
कोणत्या राज्यांसाठी भरती केली जाणार?
SBI ने देशभरातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी ही भरती(recruitment) जाहीर केली आहे. यामध्ये उत्तर प्रदेश आणि नवी दिल्लीसाठी सर्वाधिक पदे आहेत. याशिवाय गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, हरियाणा, पंजाब, तामिळनाडू, तेलंगणा, राजस्थान, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, महाराष्ट्र, केरळ, आसाम, जम्मू आणि काश्मीर आणि अनेक ईशान्येकडील राज्यांमध्येही नोकऱ्या बाहेर पडल्या आहेत.
