मनसेचे कोकण संघटक व राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर हे लवकरच राज ठाकरेंची साथ सोडून भाजपच्या गटात दाखल होणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी वैभव खेडेकर दापोलीत महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर दिसले होते. त्यावेळी महायुतीच्या नेत्यांनी वैभव खेडेकर यांना आपल्या पक्षात येण्याची जाहीर ऑफर दिली होती. यानंतर आता वैभव खेडेकर यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केल्यापासून वैभव खेडेकर त्यांच्यासोबत होते. त्यामुळे वैभव खेडेकर हे भाजपमध्ये जाणे, हा मनसेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. वैभव खेडेकर यांनी भाजप प्रवेशाचे वृत्त नाकारले आहे. मात्र, त्यांच्या निकटवर्तीयांकडून खेडेकर यांचा भाजप प्रवेश निश्चित असल्याचे सांगितले जात आहे.
वैभव खेडेकर हे राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे कोकणातील महत्त्वाचे आणि गेल्या 20 वर्षांपासूनचे शिलेदार मानले जातात. त्यांनी 2014 मध्ये वैभव खेडेकर यांनी दापोली मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यामध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता. राज ठाकरेंनी मनसे स्थापन केल्यापासून ते त्यांच्याबरोबर आहेत. इतकंच नाही तर खेड नगरपरिषद निवडून आणण्यात वैभव खेडेकर यांचा महत्त्वाचा वाटा होता. ते यापूर्वी खेडचे नगराध्यक्ष होते. या भागात शिंदे गटाचे नेते रामदास कदम आणि योगेश कदम यांच्याशी वैभव खेडेकर यांनी बराच काळ संघर्ष केला होता. पण अलीकडे उभय नेत्यांमधील संघर्ष कमी झाला होता. काही दिवसांपूर्वी दापोलीत झालेल्या कार्यक्रमात रामदास कदम यांनी आमच्यातील सर्व मतभेद भैरीच्या पायखाली गाडत आहोत, असे सांगत या संघर्षाला मुठमाती दिली होती. कोकणातील तरुण वर्गामध्येही वैभव खेडेकर यांची क्रेझ आहे. खेड आणि दापोली परिसरा वैभव खेडेकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे. वैभव खेडेकर हे त्यांच्या आक्रमक नेतृत्वशैलीसाठी ओळखले जातात. वैभव खेडेकर यांच्यावर आता सद्यस्थितीत मनसेच्या राज्य सरचिटणीस, कोकण संघटकपदाची मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे वैभव खेडेकर यांनी पक्षाला रामराम केल्यास मनसेला मोठा धक्का बसणार आहे.
